सोलापूर : महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची इबादत केल्यानंतर मंगळवारी सोलापूर शहर व परिसरात मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फित्र ( रमजान ईद) उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी होत आहे. सकाळी नमाज पठणानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. दिवसभर घरोघरी शिरखुम्यार्चा आस्वाद घेत सर्वांनी ईदचा आनंद लुटण्यास सुरूवात केली आहे. सकाळी शहरातील होटगी रोड वरील प्रमुख ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करण्यात आली.
गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली. कोरोना महामारीमुळे सलग दोन वर्षे सार्वजनिक स्वरूपात रमजान ईद साजरी झाली नाही, यंदा मात्र सर्व निर्बंध उठवले असल्याने सर्वत्र ईदचा उत्साह दिसून आला, बाजारपेठा फुलल्या होत्या,
काल सोमवारी सायंकाळी चंद्रदर्शन होताच ईद का चाँद मुबारक म्हणून एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करून शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी मंगळवारी रमजाई ईद साजरी करण्यात येईल असे सांगितले होते. मंगळवारी ईदच्या दिवशी सकाळी सर्व मशिदी व ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून व अत्तर लावून प्रसन्न चित्ताने नमाजासाठी एकत्र आले होते आलमगीर ईदगाह (होटगी रोड) या ऐतिहासिक शाही ईदगाहवर सकाळी 9 वाजता सामूहिक नमाज व प्रार्थना करण्यात आली.
देशात व जगात सुख व शांती नांदू दे, बेरोजगारांना रोजगार मिळू दे, आजारी व संकटात सापडलेल्यांची पीडा टळू दे, सवार्ना खऱ्या अर्थाने धर्माने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याची सद्बुध्दी मिळू दे अशी प्रार्थना करण्यात आली.
दरम्यान उपस्थित हजारो मुस्लिम बांधवांना संबोधित करताना शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी यांनी, मुस्लिम समाजातील शिक्षणाच्या टक्केवारी वरून तीव्र अशी नाराजी व्यक्त केली. मुस्लिम समाजातील केवळ 42 टक्के मुलं शिक्षण घेतात, 58 टक्के मुले ही शाळा आणि महाविद्यालयाला जात नाहीत. त्यामध्ये 6.55 टक्के विद्यार्थी दहावी पास आहेत, त्यात केवळ 4.44 टक्के विद्यार्थी बारावीचे शिक्षण घेतात. मुस्लिम समाजात पदव्युत्तर शिक्षणाचा टक्का 2.76 टक्के आहे आणि पदवीतर नंतर शिक्षण घेतलेल्याचे प्रमाण केवळ 0.44 टक्के येते. मुस्लिम समाजात शिक्षणाचा एवढा उतरता टक्का का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
देशाच्या लोकसंख्येत 14.2 टक्के मुस्लिम समाज आहे त्यामध्ये 6.2 टक्के पोलीस प्रशासनात आहेत, भारतीय सैन्यामध्ये प्रमाण 3 टक्के आहे, भारतीय प्रशासकीय आणि पोलीस सेवेमध्ये 3.4 टक्के मुसलमान आहेत, मुंबई उच्च न्यायालयातील 57 न्यायाधिशांमध्ये केवळ दोन न्यायाधीश मुसलमान आहेत, सर्वोच्च न्यायालयामध्ये 34 न्यायाधीशांमध्ये केवळ एक न्यायाधीश मुस्लिम समाजाचा आहे ही आकडेवारी पाहता प्रचंड त्रास होतो, हा त्रास कोणासमोर व्यक्त करावा.
आज मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. कोणत्याही पक्षाचे नाव न घेता शहर काझी यांनी विरोधी पक्षांकडून मुस्लिम समाजाला भडकवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत आम्हाला किती भडकवता, आम्ही याचे उत्तर देणार परंतु ते दगडाने नाही तर शिक्षण, पेन आणि पुस्तकांने. मुस्लिम युवकांनों भडकू नका, आम्ही तुमच्या जाळ्यात फसणारे नाही म्हणून सांगा, कारण आम्हाला महाराष्ट्र सरकारवर विश्वास आहे, हे सरकार या परिस्थितीला तोंड देण्यात सक्षम असल्याचा दावा शहर काझी यांनी केला.

















