सोलापूर दिनांक – कोणत्याही देश हा कायद्यावरच चालतो. देशात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व देश नियंत्रित ठेवण्यासाठी कायद्याशिवाय पर्याय नाही.म्हणूनच प्रत्येकाला जन्मापासून ते मरणापर्यंत कायद्याचे कवच आहे.कारण भारतात कायदा हा प्रत्येक व्यक्तीचा घटनादत्त अधिकार आहे.अशा कायद्याविषयी बहुतांश नागरिक अनभिज्ञ असतात. त्यांना कायदा म्हणजे काय,कायदा कोणासाठी आहे, कायदा कशासाठी आहे? कायद्याचे राज्य म्हणजे काय? कायद्याचे सरंक्षण कसे मिळवावे? याची माहिती नसते.म्हणून समाजात कायद्याविषयी जाणीव जागृती निर्माण करायची आवश्यकता असल्याचे मत सोलापूर जिल्हा सरकारी वकील ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीपसिंग रजपूत यांनी व्यक्त केले.
शनिवार दिनांक 3 डिसेंबर 22 रोजी विधिज्ञ दिनाचे औचित्यसाधून सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वालचंद महाविद्यालय कला व शास्त्र, पदव्युत्तर समाजकार्य विभाग,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने
मोदी येथील मसीहा चौक येथे 3 डिसेंबर सांयकाळी 6 वाजता सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरचे नरेंद्र जोशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व जिल्हा सरकारी वकील अँड.प्रदीपसिंग रजपूत यांच्या अध्यक्षतेखाली कायदे विषयक जनजागृती शिबिर पार पडले.
यावेळी वालचंद महाविद्यालय कला व शास्त्र, पदव्युत्तर समाजकार्य विभाग प्रमुख डॉ.निशा वाघमारे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, देशात कायद्याचे राज्य असले तरी सामाजिक गुंतागुंती कायम आहे. हा गुंता सोडवण्यासाठी सामाजिक भान जागृत करणे काळाची गरज आहे.
तदपूर्वी मार्गदर्शन करताना अँड लक्ष्मण मारडकर,अँड.रेवण पाटील व अँड.डी.व्ही.किणगी यांनी महाराष्ट्र विधी सेवा व सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संविधानाच्या कलम ३९-अ आणि १४ अंतर्गत संविधानात्मक आदेशानुसार प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 (1987 च्या 39) अंतर्गत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. आर्थिक किंवा इतर कारणांमुळे नागरिकांना न्याय नाकारला जाऊ नये, म्हणून “सर्वांसाठी न्याय ” हा यामागचा मूळ उद्देश आहे. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे केवळ मानवी हक्क, मागण्या अथवा केवळ नागरी अथवा राजकीय अधिकार या घटकांपुरता एखाद्या व्यक्तीचा आत्मसन्मान मर्यादित नाही, तर त्यात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांचाही समावेश होतो. भारतीय संविधानाचे पालन करताना न्याय प्रक्रियेत सर्वांसाठी समता आणि निष्पक्षपातीपणाची हमी घेत योग्य, व्यावहारिक आणि सकारात्मक पावले उचलणे, हे विधी सेवा प्राधिकरणाचे उद्दीष्ट असून त्याच्या पूर्ततेच्या दिशेने कल राहणे अपेक्षित आहे. हे खरोखरच कष्टसाध्य काम आहे. आजघडीला समाजाला गरिबी आणि निरक्षरतेचा मोठाच शाप आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत विधी सेवा प्राधिकरणाची भूमिका मोलाची ठरते. याची माहिती दिली.
यानंतर प्रश्नोत्तर सत्रात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न उपस्थित केले व याला अँड.रेवण पाटील यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले.
डॉबाबासाहेबआंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.तदनंतर भारताचे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.विजया महाजन, सामाजिक कार्यकर्ते अमित मंचले आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड.मोहन कुरापाटी यांनी तर सूत्रसंचालन अँड.अनिल वासम यांनी केले तर आभार प्रदर्शन अँड.प्रशांत कांबळे यांनी केले.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी मसीहा तरुण मंडळ, शाम आडम,चैतन्य केंगार,वैभव कांबळे, मल्लिनाथ कलशेट्टी, अश्विनी मामड्याल ,माधवी अंधे अँड.विशाल भरमशेट्टी, अँड.संतोष म्हमाणे, अँड.भरत जाधव, नरेश गुल्लापल्ली, भानुचंद्र म्याकल आदींनी परिश्रम घेतले.



















