सोलापूर शहर काँग्रेस कमिटी मध्ये कार्यकर्ते कमी अन् पदाधिकारी जास्त असे चित्र आहे, कोणता पदाधिकारी आपल्या पदाला किती न्याय देतोय हे सर्वश्रुत आहे. एकाच घरात दोन पदे आहेत, तीन वर्षांपूर्वी शहर अध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छूक होते, शेवटी खरटमल यांच्या राजीनाम्यानंतर शहर उत्तर व काँग्रेस पासून लांब होत चाललेला लिंगायत समाजाचा विचार करत काँग्रेस श्रेष्ठींनी प्रकाश वाले यांच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ घातली, मात्र अध्यक्षपदावर डोळा ठेवलेल्या माजी महापौर संजय हेमगड्डी, “स्वीट स्वीट” बोलणारे अरुण शर्मा यांचा चांगलाच हिरमोड झाला, पक्षाने याचा विचार करून शहरात दोन कार्याध्यक्ष पदे नव्याने तयार केली आणि ती पदे लगेच हेमगड्डी व अरुण शर्मा यांना दिली,
तसे पाहिले तर शहर कार्याध्यक्ष पद ही तसे कामाचे आहे, पदाला न्याय तो नेता कसा देतोय त्यावर त्या पदाचे महत्व वाढते, आजपर्यंत या दोन कार्याध्यक्षांनी कोणतंही स्वतंत्र आंदोलन घेतले नाही, कोणता कार्यक्रम घेतला नाही, केवळ जयंती, पुण्यतिथी, राष्ट्रीय सण आंदोलन व उपोषणाला ते हजेरी लावतात, शहर कार्याध्यक्ष पदाला न्याय कसा द्यायचा हे राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्याकडून शिकलं पाहिजे.
का म्हणून या दोघांनी हे पद घेतलंय असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. शेवटी आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी माजी नगरसेवक मनोज यलगुलवार यांना शहराचे तिसरे कार्याध्यक्ष पद दिले, पद मिळाल्या पासून यलगुलवार सक्रिय झाले आहेत, ते सर्व कार्यक्रमाला तर असतातच परन्तु सध्या एक घास मदतीचा या माध्यमातून ते वंचितांचा आधार झाल्याचं चित्र आहे,
ख्रिश्चन धर्मगुरूना धान्याचे किट वाटप, भगवान नगर मधील कामगार वर्गातील 500 नागरिकांना जेवण वाटप, राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त मांग गारुडी समाजाला अन्नधान्य किट वाटप, पत्रकार बांधवांना मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप केले, गरजू काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांना मदतीचा हात दिला, यासह मोची गल्ली, लोधी गल्लीतील कंटेंटमेन्ट झोन उठवण्याबाबत पोलीस, महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. यंत्रमाग, विडी, बांधकाम व असंघटित कामगारांना सरकारने मदत देण्यासाठी निवेदन देऊन लक्ष वेधले,
मनोज यलगुलवार शहर कार्याध्यक्ष पदावर आल्याने खरा न्याय या पदाला मिळाला आहे, यलगुलवार जरी आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्याच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा जरी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असली तरी इतर कार्याध्यक्ष ते सुद्धा करताना दिसत नाहीत , दोन वर्षापेक्षा अधिक काळ होऊनही हेमगड्डी व शर्मा यांनी किती कार्यक्रम घेतले, कोणकोणते उपक्रम राबविले, कोरोना काळात काय काय केले, सध्या तर किती कठीण काळ आहे, असे असताना यांचा वाटा किती आहे हा ‘जाब’ पक्षाने व वरिष्ठांनी विचारणे गरजेचे बनले आहे.


















