सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत बेकायदा वाळू मुरुम, माती, दगड उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून २१ कोटी ४५ लाख १५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. मात्र, वसुली फक्त ६५ लाख १० हजारांची झाली आहे. मार्च २०२३ अखेर वसुली पूर्ण करा, असे आदेश अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, बार्शी, माळशिरस, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, करमाळा, माढा, सांगोला या तालुक्यांत १ एप्रिल २०२२ ते ३१ नोव्हेंबर २०२२ दरम्यान कारवाया करण्यात आल्या होत्या. वाळू, मुरुम, माती व दगडाचे बेकायदेशीर उत्खनन व वाहतूक केले जात होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर संबंधित तहसीलदारांनी उत्खनन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले होते, त्याचबरोबर दंडात्मक कारवाईही झाली होती.
सात महिन्यांत वाळूच्या उत्खनन व वाहतुकीचे ४५५ प्रकार निदर्शनास आले होते. याप्रकरणी ३ कोटी ८१ लाख ३४ हजारांचा दंड झाला होता. मात्र, ४६ लाख ८१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मुरुम उत्खनन व वाहतुकीचे ५६ प्रकार निदर्शनास आले आहेत. याप्रकरणी १४ कोटी ७९ लाख ११ हजारांचा दंड लावण्यात आला आहे. वसुली फक्त ८ लाख २९ हजारांची झाली आहे.
माती उत्खनन व वाहतुकीचे ६ प्रकार आढळले होते, त्यात २२ लाख ३६ हजारांचा दंड झाला होता. दगडप्रकरणी ५ प्रकार आढळले होते, त्यात दोन कोटी ६२ लाख ३५ हजारांचा दंड झाला होता. फक्त ९ लाख ९३ हजारांचा दंड वसूल झाला आहे.
उत्खनन व वाहतूकप्रकरणी ४५४ गुन्हे दाखल
जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान वाळू उत्खनन व वाहतूकप्रकरणी संबंधितावर ४५४ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ३२९ लोकांना अटक झाली आहे. कारवाईमध्ये ९ शासकीय अधिकाच्यांवर हल्ले झाले होते.
वाळू वाहतूक प्रकरणात ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी ट्रक आदी प्रकारची १०९ वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर मुरुमप्रकरणी १२ वाहने जिल्हा प्रशासनाने जप्त केली आहेत. वाळू उपसा करणारे नदीतील एक यंत्र जप्त केले आहे.

















