सोलापूर – सामर्थ्यशाली भारताच्या उभारणीत तरुण पिढीचे महत्व व भूमिका खूप मोठी आहे. परंतु ही तरुण पिढी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाच्या महाजालात वेढलेली असून यांना सकारात्मक तंत्रज्ञानाची दिशा दाखवण्याचे काम शिक्षकवर्गांने अत्यंत सक्षमपणे पार पाडले पाहिजे, असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित सन 2020- 21, 2021-22 व 2022- 23 या तीन वर्षाच्या जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री विखे पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, शिक्षणाधिकारी(प्रा.) प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी(मा.) महारुद्र नाळे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, शहाजी पवार, नरेंद्र काळे, शशिकांत चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख व पुरस्कारार्थी शिक्षक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. विखे पाटील पुढे म्हणाले की, नव भारताच्या उभारणीत सकारात्मक तंत्रज्ञान आधारित तरुण पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे. आजच्या तरुण पिढीसमोर समाज माध्यमाचे व त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीचे फार मोठे आव्हान आहे. यातून तरुण वर्ग गुन्हेगारीशी संबंधित घटनाना लवकर बळी पडत आहेत. या तरुण वर्गाला अशा घटना पासून दूर ठेवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेवर येऊन पडलेली आहे. समाज माध्यमांमुळे उत्कर्ष ही होऊ शकतो व अधोगती ही होऊ शकते, त्यामुळे कशाचा स्वीकार करायचा याबाबत तरुणांना जागृत करण्याची भूमिका शिक्षकांनी घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आव्हाळे यांनी पुरस्कार प्राप्त सर्व आदर्श शिक्षकांना शुभेच्छा देऊन पुढील काळात ही त्यांच्याकडून उत्कृष्ट ज्ञानदानाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. मिराकले यांनी केले. यावेळी त्यांनी प्राथमिक शिक्षक विभागाच्या वतीने लोकसहभागातून प्राथमिक शिक्षण विभागाने सात ते आठ कोटीचा निधी जमवून शाळांचा शैक्षणिक विकास केल्याची माहिती दिली. तसेच चट्टोपाध्याय 118 शिक्षक लाभाचे आदेश लवकरच वितरित करण्यात येत असल्याचेही सांगितले.
प्रारंभी राज्यगीत गायनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले, त्यानंतर दीप प्रज्वलन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मागील तीन वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.
*******