सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दिला 2 कोटीचा निधी ; या आजाराचे उपचार मोफत होणार
सोलापूर : राज्यात गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराने धुमाकूळ घातला आहे. सध्या महाराष्ट्रात या आजाराचे तब्बल 74 रुग्ण आढळले आहेत. यातील 14 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत. तर पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सोलापुरात पाच रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे सध्या भीतीदायक वातावरण पसरत आहे.
याच पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने जिल्हा नियोजन समिती मधून दोन कोटीचा निधी आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्द केला आहे.
मंगळवारी जिल्हाधिकारी आशीर्वाद, सिवहील हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी पत्रकार परिषद घेत सोलापूरकरांना आवाहन केले.
जिल्हाधिकारी म्हणाले, सोलापुरात या आजाराचे पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे सोलापूरकरांनी या आजाराला घाबरू नये केवळ काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हा आजार संसर्गजन्य नाही असे सांगत दूषित पाणी न पिता पाणी उकळून प्यावे, उघड्यावरचे व शिळे अन्न खाऊ नका, मांसाहारी पदार्थ आणि अंडी चांगल्या प्रकारे शिजवून खावीत असे आवाहन केले. तसेच त्यांनी जीबीएस आजारावर उपचारासाठी आवश्यक औषधे ईमोग्लोबिन तसेच इंडक्शन स्टडी साठी आवश्यक मशनरी खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेप्रमाणे दोन कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच आवश्यकता पडेल तर आणखीही निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.