सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झेडपीची सर्वसाधारण सभा मंगळवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली. प्रारंभी चार नवीन गटविकास अधिकारी यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, इशाधिन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, बांधकाम कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, शफिक नाईकवाडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, जलसंधारण अधिकारी पंडित भोसले, प्रकल्प संचालक स्मिता पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, कृषी अधिकारी विवेक कुंभार, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ नवनाथ नरळे यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती. सर्व विभाग प्रमुखांनी आपले विषय वाचून दाखवले त्याला मंजुरी देण्यात आली.
उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सीईओ स्वामी म्हणाले, पुढच्या वर्षी 31 मार्चलाच अकाउंट क्लोज होणार आहेत.1 एप्रिल रोजी 1 रुपये खर्च करता येणार नाही. मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे 22-23 च्या मंजुरी डिसेंबर अखेर संपल्या पाहिजेत ही खबरदारी एचओडी व बीडीओ यांनी घ्यावी. सर्व विभागांनी मक्तेदार, अकाउंट ऑफिसर, इतर कर्मचारी, एजन्सी असतील त्यांना सूचना द्याव्या. या सर्वसाधारण सभेत हा विषय प्रोसिडिंगला घ्या अशा सूचना त्यांनी केल्या.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील नादुरुस्त व बंद असलेले 75 तलाव हे अमृत सरोवर उपक्रमातून चालू करण्यात येणार आहेत. मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत दिलीप स्वामी यांनी जलसंधारण अधिकारी पंडित भोसले व शासनाच्या जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. हे काम नक्की कोण करणार आहे हे ठरवा. त्याचा कालबद्ध कार्यक्रम तयार करून येत्या 30 जुलैपर्यंत सर्व तलाव हे दुरुस्त झाले पाहिजेत. येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी 75 तलावांवर स्वातंत्र्य दिनाचे झेंडावंदन करण्यात येणार आहे.