दोन तासाच्या वेटिंग नंतर भेट ; पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर सरपंच परिषदेचे समाधान
सोलापूर : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना सरपंच परिषदेने निवेदन दिले दोन तासाच्या वेटिंग नंतर झालेल्या भेटीने सरपंच परिषदेने समाधान व्यक्त केले. यावेळी पालकमंत्र्यांकडे परिषदेने सुमारे नऊ मागण्या केल्या आहेत. यापैकी अनेक मागण्यांवर पालकमंत्री गोरे हे सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. शासकीय विश्रामगृहात त्यांनी सकाळच्या सुमारास नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी सरपंच परिषदेने त्यांची वेळ घेतली होती. सकाळी साडेआठ वाजता परिषदेचे सर्व पदाधिकारी येऊन थांबले, साडेदहा वाजेपर्यंत त्यांची भेट झाली नव्हती. शेवटी दोन तासाच्या वेटिंग नंतर पालकमंत्र्यांनी त्यांना भेटायला बोलावले.
सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट विकास जाधव, सोलापूर जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील, सरपंच उमेश भगत, परिणीती शिंदे, मीरा साळुंखे, विकास पाटील, जगन्नाथ गायकवाड, आशिष क्षीरसागर, अंजली क्षीरसागर, सुनील जाधव यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले.
नवी मुंबई येथे सर्व सुविधायुक्त सरपंच भवनाची निर्मिती करावी, सरपंच, उपसरपंच यांना वाढीव मानधन सुरू केले आहे त्याची अंमलबजावणी करावी, सरपंच, उपसरपंच यांना एसटी प्रवास मोफत करण्यात यावा, राज्यात अपात्र ठरलेल्या सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना तीन महिन्याची जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ द्यावी, सरपंच परिषदेच्या राज्य पदाधिकाऱ्यां सोबत बैठक आयोजित करावी, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत स्तरावर सरपंच कक्ष निर्माण करावे यासह दहा मागण्या ग्रामविकास मंत्री गोरे यांच्याकडे करण्यात आल्या त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे विकास जाधव यांनी सांगितले.