“अकरा तारखेला, अकरा वाजता’ कुणाचे बारा वाजणार ! सचिन कल्याणशेट्टी यांच्या यांच्या मनातला चेअरमन कोण?
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चांगलीच गाजली. सत्ताधारी दोन भारतीय जनता पार्टीचे आमदार मध्ये झालेल्या या निवडणुकीत जरी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने बाजी मारली असली तरी माजी सरकार मंत्री, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांनी मात्र ग्रामपंचायत मतदार संघामध्ये चांगलीच लढत दिल्याचे पाहायला मिळाले.
कल्याणशेट्टी, माने आणि हसापुरे यांच्या पॅनलने तब्बल 15 जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. सुभाष देशमुख यांच्या पॅनलला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत.
या निवडणुकीनंतर आता बाजार समितीचा चेअरमन कोण याकडेच सगळ्या त्या नजरा लागल्या आहेत. अनेकांच्या मते दिलीप माने हेच चेअरमन होतील अशीही चर्चा ऐकण्यास मिळत असून सुरेश हसापुरे यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे.
दरम्यान दोन मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी चेअरमन निवडीची तारीख काढली असून रविवार 11 मे रोजी सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या सभागृहात चेअरमन व्हाईस चेअरमन ची निवड केली जाणार आहे.
सचिन कल्याणशेट्टी यांनी पॅनल करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच या निवडणुकीत उडी घेतल्याचे सांगण्यात आले आणि चेअरमन पदाचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस हेच घेतील असेही नेते म्हणाले होते. त्यामुळे आता येत्या रविवारी चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता असून सचिन कल्याणशेट्टी यांच्या मनातील तो चेअरमन कोण असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर खरेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चेअरमन पदाचे नाव आले तर वेगळा चेहरा त्या पदावर बसल्याचे पाहायला मिळेल यात नवल वाटायला नको.