सोलापूरच्या छाया-प्रकाश फाऊंडेशनच्यावतीने ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमोल पालेकर यांना ‘कलाकौस्तुभ’ पुरस्कार तर मूळचे सोलापूरचे चतुरस्त्र लेखक अच्युत गोडबोले यांना ‘अभिवंदन’ पुरस्कार देण्यात येणार आहे. सोलापुरात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता
सायंकाळी पाच वाजता बालाजी सरोवर पंचतारांकित हॉटेलमध्ये निमंत्रितांच्या उपस्थितीत हे पुरस्कार वितरीत होत असताना अचानक संभाजी ब्रिगेड व संभाजी आरमार च्या कार्यकर्त्यांनी वादग्रस्त लेखक गिरीश कुबेर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी सर्व कार्यकर्त्यांना विजापूर नाका पोलीस स्टेशन च्या पोलिसांनी ताब्यात घेतले, यामध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले सीताराम बाबर गजानन शिंदे मलू भंडारी ज्ञानेश्वर पुजारी, संभाजी आरमारचे सोमनाथ मस्के राजू रच्चा, अनंतराव नीळ, शशिकांत शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता..
गिरीश कुबेर यांचे ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले मे २०२१ मध्ये. सहा महिने उलटून गेलेले आहेत. या सहा महिन्यात या पुस्तकासंदर्भात विविध घटकांनी आक्षेप नोंदवले आहेत. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह अनेक सामाजिक संघटनांनी आक्षेप नोंदवले आहेत. पुस्तकातील आक्षेपार्ह भाग वगळावा, पुस्तकावर बंदी घालावी आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कुबेर यांच्यावर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.
छत्रपती संभाजी महाराजांनी आपला वारसाहक्क मिळवण्यासाठी महाराणी सोयराबाई यांना ठार केले, हा पुस्तकातला आक्षेपार्ह मजकूर आहे.
छत्रपती संभाजी महाराज अत्यंत धाडसी असले तरी त्यांच्यात वडिलांकडे असणाऱ्या संयम आणि मुत्सद्दीपणाची कमतरता होती, असेही संबंधित पुस्तकात म्हटले आहे. लेखकाचे ते मत आहे आणि त्यांना ते व्यक्त करण्याचा अधिकार असल्यामुळे त्यासंदर्भात आक्षेप घेणे मला इष्ट वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांशी बाजीराव पेशव्यांची केलेली तुलनाही लेखकाच्या आकलनाचा आणि मनोवृतीचा भाग म्हणून दुर्लक्षित करता येऊ शकते.
परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी सावत्र आई सोयरबाईंना ठार केले अशी धादांत खोटी मांडणी कुबेरांनी पुस्तकात केली आहे. चिटणीसाची बखर किंवा अशाच काही बखरकारांनी केलेल्या बदनामीकारक लिखाणाचा आधार घेऊन कुबेरांनी ही मांडणी केली आहे, आणि त्यांचे म्हणणे असे की, आपण पुराव्यांच्या आधारे लिहिले आहे.
संभाजी महाराजांचा हा इतिहास खोटा असल्याचे वा.सी. बेंद्रे यांच्यासारख्या संशोधकांनी दीर्घकाळ संशोधन करून सिद्ध केले आहे. नंतरच्या काळातील अनेक इतिहासकारांनी त्याला पुष्टी दिली आहे.
कोणत्याही जबाबदार लेखकाने अद्ययावत संदर्भ वापरणे अपेक्षित असते. ते इथे केले गेलेले नाही. संवेदनशील विषयांबाबत अधिक जबाबदारीने लेखन करणे आवश्यक असते, त्या जबाबदारीचे भानही इथे दिसत नाही. खोट्या पुराव्यांच्या आधारे बदनामीकारक लिहिणे, चारित्र्यहनन करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसत नाही त्यामुळे शिव शंभू प्रेमीचा मनात असंतोष निर्माण झाला होता


















