सोलापूर : (प्रशांत कटारे) सोलापूर शहर आणि जिल्ह्यांमध्ये या महिन्याभरात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. सोलापूर शहरांमध्ये अक्कलकोट रोडवर ड्रेनेज चेंबरचे काम करताना चार कर्मचाऱ्यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला, यामध्ये 3 कामगार हे परप्रांतीय होते, एक कामगार हा सोलापुरातील होता मात्र त्यामध्ये दोघांचा जीव वाचण्यात आला. एका कामगाराने दुसऱ्या कामगाराचा जीव वाचवला हा प्रसंग अंगावर शहारे आणणारा होता, या घटनेत चार कुटुंब उध्वस्त झाली.
त्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावामध्ये जळण आणायला गेलेल्या तीन मुली तहान लागल्याने एका शेतामध्ये असलेल्या शेततळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी उतरल्या असता त्यांचा पाय घसरून बुडून दुर्दैवी मृत्यू झाला दोन कुटुंबावर आभाळ कोसळले. अत्यंत हृदयद्रावक ही घटना होती.
सोलापूरचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे हे तब्बल एक महिन्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. पालकमंत्र्यांचा दौरा म्हटले की, बरेच कार्यक्रम उरकून घेतले जातात, त्यातच पक्षाचे हौशे गौशे ही आपले कार्यक्रम घेऊन मोकळे होतात, पालकमंत्री म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा पालक. सर्वांची दुःख समान जाणणारा.
शहर जिल्ह्यात दुर्घटना झाल्या, दुर्दैवी घटना घडल्या की, पालकमंत्री, प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी त्या कुटुंबियांची भेट घेतात, सांत्वन करतात, प्रशासन, सरकार कडून अपेक्षित मदतीचे आश्वासन दिले जाते, मात्र पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यात अशा सांत्वनपर भेटीचा कोणताही उल्लेख नाही, 2-3 खाजगी कार्यक्रम आहेत.
राज्यात अतिवृष्टी, दुष्काळ, मोठी दुर्घटना घडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे सर्वात अगोदर तिथे असतात मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सोलापूर शहर व जिल्ह्यात घडलेल्या घटना माहिती नसाव्यात की, सोलापूरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी सांगितलेले नाही. एकूणच शुक्रवारचा दौरा पाहता आणि दुर्दैवी घटनांचे गांभीर्य ओळखता पालकमंत्र्यांना गरिबांसाठी वेळ नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्दैव म्हणावं लागेल.


















