सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सध्या ॲक्शन मोडवर आहेत. जाता जाता दोघा-चौघांचा कार्यक्रम करण्याच्या मूडमध्ये ते सध्या दिसत आहेत. बुधवारी त्यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या बैठका घेऊन चांगलीच तंबी देऊन विविध सूचना केल्या आहेत.
यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक विभाग प्रमुखांनी नागरिकांच्या तक्रारी निवारण बैठका घेऊन त्याचा अहवाल देण्याच्या सूचना होत्या मात्र ते कुणीही केले नसल्याचे निदर्शनास आल्याने परत त्यांनी मुदत दिली असून ते न झाल्यास विभाग प्रमुखांवर कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना आता ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे, त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून होईल, जर कर्मचारी बिगर ओळ्खपत्राचे आढळल्यास त्याची रजा मांडली जाईल, जर त्याची शिल्लक रजा नसेल तर त्याला बिनपगारी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्हा परिषद आवारातील ‘पे अँड पार्किंग’चा मक्त्याची जाहिरात निघाली असून त्याची अंमलबजावणी लवकरच होईल, जिल्हा परिषदेचे दोन्ही गेट बंद केल्याने आता गर्दीही कमी झाली असल्याचे ते म्हणाले.