सोलापूर : मागील पाच वर्षात उजनी धरण 110 टक्के भरले पण, सोलापूर शहाराला 5 दिवसाआड पाणी मिळते, समांतर जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ होऊन 4 वर्ष होत आली अद्यापही काम सुरू नाही. कामाची किंमत दुपटीने वाढली आहे. याला स्मार्ट सिटीचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत काम, टेंडर कुणालाही द्या पण सोलापुरकरांना हक्काचे पिण्याचे पाणी द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा माजी आमदार दिलीप माने यांनी दिला.
सोलापूर शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र शासनाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीच्या कामाचा शुभारंभ ०९ जानेवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. मात्र चार वर्षात या योजनेचे काम महानगरपालिकेच्या लहरीपणामुळे अद्यापही सुरु झाले नाही.
उजनी जलाशय गेली पाच-सहा वर्षापासून १०० टक्के भरलेला असताना सोलापूर शहरवासियांना गेल्या अनेक वर्षापासून चार ते पाच दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा वेळी-अवेळी पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सोलापूर शहरवासियांना पिण्याच्या पाण्यापासून वंचीत रहावे लागते.
सोलापूर महानगरपालिका वर्षाला सुमारे ४० कोटी रुपये पाणीपट्टी वसुल करते परंतु वर्षातील १०० दिवससुध्दा पाणी पुरवठा करीत नाही. समांतर जलवाहिनीचे काम त्वरीत करुन नागरीकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा या जनतेच्या न्याय मागणीसाठी बुधवारपासून दिलीप माने यांनी पूनम गेटसमोर आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे.
या आंदोलनात जयकुमार माने, केदार उंबरजे, पृथ्वीराज माने, संभाजी भडकुंबे, अनिल वाघमारे, समीउल्ला शेख, सुनील जाधव, अजय सोनटक्के, सचिन चौधरी, शैलजा राठोड, गंगाधर बिराजदार, महेश घाडगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.


















