सोलापूर (प्रतिनिधी) : हरित वसुंधरा फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पर्यावरणास प्रतिकूल अशा विदेशी प्रजाती हद्दपार करण्याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. अमित बनसोडे, अजय आलटे, शेखर क्षीरसागर, प्रवीण भालेराव, गौरव जक्कल, उमाकांत गजेली, प्रशांत गाजुल, सागर संभारम, तानाजी यादव हे सदस्य उपस्थित होते.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागच्या काही दशकात विदेशी प्रजातींची लागवड मोठ्या प्रमाणावर केली गेली आहे. ती तात्काळ थांबवणे अत्यंत आवश्यक बनले आहे. कारण या विदेशी प्रजाती स्थानिक पर्यावरणासाठी घातक ठरत आहेत. पक्षी, कीटक, फुलपाखरे यांसारख्या पर्यावरण परिसंस्थेतील घटकांसाठी ते निरुपयोगी असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे इथून पुढे शासनाच्या वतीने जे वृक्षारोपण केले जाते आणि शासकीय रोपवाटिकेत ज्या रोपांची निर्मिती केली जाते त्यामध्ये गुलमोहर, रेन ट्री, सप्तपर्णी, या विदेशी प्रजातींचा समावेश केला जाऊ नये असे या निवेदनात सांगितले आहे. सोलापूरकरांनी ही यापुढे फक्त स्थानिक व देशी प्राजतींचेच वृक्षारोपण करावे असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले.


















