सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाची कायमच चर्चा असते. मागील दोन निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा पराभव झाला असताना दुसरीकडे भारतीय जनता पार्टीला मात्र स्थानिक उमेदवार मिळालेला नाही. दोन्ही खासदार जरी स्थानिक म्हणत असले तरी त्यांच्या कामकाजावर ना जनता समाधानी, ना पक्ष समाधानी. असे चित्र 9 वर्षात पाहायला मिळाले आहे.
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नाही असे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे काँग्रेसने ही निवडणूक नाही लढवल्यास याठिकाणी राष्ट्रवादी उमेदवार देण्यासाठी इच्छुक दिसून येतो जर काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे उमेदवार नसतील तर लोकसभेच्या जागेवर माझा क्लेम असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल यांनी केला आहे.
दुसरीकडे भारतीय जनता पार्टी उमेदवाराच्या शोधात आहे. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते राजा सरवदे यांनी आता भाजपच्या जागेवर आपला दावा केला आहे. लोकसभा निवडणुक लढवणार अशी भूमिका त्यांनी जाहीर करून टाकली आहे. भाजपला उमेदवार नसल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे राजा सरवदे यांच्यासाठी या जागेची मागणी युतीतून करू शकतात.
अशा राजकीय पार्श्वभूमीवर 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील आंबेडकर चौकात अभिवादन करण्यासाठी रिपाइं नेते राजा सरवदे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते सुधीर खरटमल हे सुद्धा आले होते. त्याचवेळी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. सरवदे यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आता आपण एकमेकांच्या विरोधात लढणार, असे सूतोवाच केले. तुमच्या उमेदवारीचा विषय दिल्लीपर्यंत गेला आहे असेही ते म्हणाले. खरटमल यांनी लोकसभेच्या जागेवर माझा पण दावा आहे परंतु लढत ही आपल्या दोघांमध्ये होत असेल तर तुमच्यासाठी मी माघार घेतो, आपण मित्र आहोत आपल्या दोघात लढत होणे योग्य नाही असेही खरटमल सरवदे यांना म्हणाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळाली.

















