मोठा गाजावाजा करत केंद्र सरकारने १ मेपासून देशातील १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात करण्याची घोषणा केली होती. मात्र लसींच्या टंचाईमुळे या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरुवातीपासूनच अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले होते. दरम्यान, लसींच्या कमी पुरवठ्यामुळे आता राज्य सरकारने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोनाविरोधातील लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे तूर्तास लसीकरण केले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले की, लसीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील नारगिकांचे लसीकरण तूर्त न करणााचा निर्णय सरकारने घेतला आहे. सध्या ज्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली आहेत त्यांना दुसरा डोस मिळणे आवश्यक आहे. त्याचे कारण म्हणजे दुसरा डोस न घेतल्यात पहिल्यांदा घेतलेल्या लसीची उपयुक्तता राहणार नाही. त्यामुळे याआधीच कोरोनाविरोधातील लसीचा पहिला डोस घेतलेल्यांचे लसीकरण करणे गजरेचे आहे.
दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन हे १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय़ मंत्रिमंडळाने घेतल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. लॉकडाऊन केल्यानंतर राज्यातील अॅक्टिव रुग्णांची संख्या घटली आहे. भारतातील सरासरी रुग्णवाढीपेक्षा महाराष्ट्रातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काही दिवस वाढावा, असा कल मंत्रिमंडळाने दर्शवला. तसेच मुख्यमंत्र्याना सांगण्यात आले. आता याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.



















