सोलापूर – शासनाच्या विद्यार्थी गणवेश वाटप योजनेची रक्कम खर्ची टाकण्याकरिता राबवण्यात येत असलेली PFMS ही पद्धत नवीन असल्याने अनेक मुख्याध्यापकांना ही प्रणाली लवकर अवगत होऊ शकली नाही. या online किचकट पद्धतीमुळे व दिलेल्या अल्प मुदतीमुळे जिल्ह्यातील साधारणपणे जिल्ह्यातील 380 शाळांच्या मुख्याध्यापकांना गणवेश खरेदीस विलंब झाला. दरम्यान गणवेश खरेदी न झाल्यामुळे या शाळांना दिलेले अनुदान शासनाकडे परत गेले. यामुळे साधारणपणे 30 हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. परत गेलेले अनुदान पुन्हा द्या अशी मागणी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनांच्या गुरुसेवा परिवाराच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्या लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार व उपमुख्यलेखा वित्त अधिकारी उत्तम सुर्वे व शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे केली असल्याची माहिती जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस सूर्यकांत हत्तुरे ( डोगे )यांनी दिली.
मागील वर्षी जि. प. शाळांची महाराष्ट्र बँकेत खाती उघडण्यात आलेली होती. या खात्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षाकरिता सप्टेंबर महिन्यात गणवेशाच्या रक्कमेचे लिमिट सेट करून PFMS प्रणालीद्वारे गणवेश खरेदी करण्याचे सूचित करण्यात आले. याप्रमाणे जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापकांनी गणवेश खरेदी करून त्याचे वाटपही केले परंतु हे करताना दक्षिण सोलापूर मधील 26, उत्तर सोलापूर मधील 22, अक्कलकोट मधील 18, करमाळ्यातील 39, माळशिरस मधील 69, मोहोळ मधील 6, पंढरपुरातील 53, बार्शी मधील 40, माढ्यातील 30, मंगळवेढ्यातील 32, सांगोल्यातील 45 अशा एकूण जिल्ह्यातील 380 मुख्याध्यापकांना या कामी विलंब लागला. दरम्यान या शाळेचे अनुदान शासनाकडे परत गेले व या शाळा गणवेश अनुदानापासून वंचित राहिल्या.
या ही रक्कम नंतर पुन्हा मिळेल असे वाटत असतांना अचानक ही बँक खाती बंद करून HDFC बँकेत नवीन खाती काढण्याविषयी शासन स्तरावरून सांगण्यात आले आहे.
आता या राहिलेल्या शाळेतील विद्यार्थी व पालकांकडून वारंवार गणवेशाची मागणी मुख्याध्यापकडे होत आहे. ज्यांनी क्रेडिटवर गणवेश आणले. त्यांच्याकडे गणवेश वितरक रकमेची मागणी करीत आहेत.
याविषयी संबंधित मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दाद मागितली असता त्या कार्यालयाकडून एचडीएफसी बँकेत खाते उघडल्यानंतर याचा विचार होईल असे सांगितले गेले. पण अद्याप एचडीएफसी बँकेत अद्याप खाते उघडले गेले नाहीत. यामुळे मुख्याध्यापकांची हेळसांड होत आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी व लेखा, वित्त अधिकारी यांनी यात लक्ष घालून मुख्याध्यापकांची होणारी हेळसांड थांबवावी व किमान प्रजासत्ताक दिनापूर्वी मुलांना गणवेश मिळतील अशी तजवीज करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना सूर्यकांत हत्तुरेसह आदर्श समितीचे नेते बाबा शेख, शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष महिबूबसाब सवार, आदर्श समितीचे जिल्हा सरचिटणीस सूर्यकांत व्हनमाने, संघाचे नेते सिद्राम कटगेरी आधी गुरुसेवा परिवारातील पदाधिकारी उपस्थित होते.




















