सोलापूर : शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे मंगळवारी पक्षाच्या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक झाली. पवार यांनी पक्षातील प्रमुख नेते, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह पूर्ण दिवसाभरात कोल्हापूर, अहमदनगर, माढा, सातारा, परभणी, बीड, उस्मानाबाद, नाशिक आणि दिंडोरी या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सुनील तटकरे, माजी छगन भुजबळ, यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
या बैठकीला माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे या दोन्ही नेत्यांची गैरहजेरी होती. यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे सुद्धा उपस्थित नव्हते. जिल्ह्याचे कार्याध्यक्ष उमेश पाटील, माजी आमदार राजन पाटील, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार दिपक साळुंखे, माळशिरसचे नेते उत्तमराव जानकर, माजी मंत्री रामराजे निंबाळकर, प्रदेश सचिव लतीफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह पंढरपुरातील काही नेते बैठकीला उपस्थित होते.
पक्षबांधणीच्या दृष्टीने पक्षाची ध्येयधोरणे आखण्यासाठी ही आढावा बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगण्यात आले. शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विविध सूचना केल्या. राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस एकत्रित निवडणुका लढविणार आहे आणि महाविकास आघाडीला राज्यामध्ये वातावरण चांगले असून यंदा काही करून माढा लोकसभा राष्ट्रवादीला जिंकायची आहे. आपापसातील हेवेदावे मतभेद विसरून कामाला लागा अशा सूचना उपस्थित कार्यकर्त्यांना दिल्या.



















