सोलापूर : माजी आमदार दिलीप माने. सोलापूर जिल्ह्यातील सहकार, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व. सहकारांमध्ये तर त्यांचा हात कुणीच पकडू शकत नाही असे अनेक किस्से यापूर्वी पाहायला मिळाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा दूध संघ या सहकारी संस्थांमध्ये त्यांचे कायम वर्चस्व राहिले आहे.
सध्या दिलीप माने हे वादळापूर्वीची राजकीय शांतता असं काहीसं चित्र दिसून येत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडून शहर मध्य या मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना अपयश आले तेव्हापासून त्यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेले नाही. त्यानंतर वाटत होते ते मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील परंतु ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही जवळचे मानले जातात. विधान परिषदेसाठी त्यांची चर्चा झाली परंतु राज्यातील समीकरणे बदलली त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेची निवडणूक झालीच नाही.
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या भागात त्यांची संघटन बांधणी भक्कम आहे. दिलीप माने यांनी पुन्हा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशा मागणीने आता जोर धरला आहे.
मागील चार वर्षांमध्ये राज्यात अनेक वेळा राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे दिलीप माने हे शांत आहेत. आपली राजकीय भूमिका ते स्पष्ट करत नाहीत. माने हे नक्की कोणत्या पक्षात असाही प्रश्न उपस्थित केला जातो. दक्षिण सोलापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला. याच मतदारसंघातून दिलीप माने हे 2009 सालामध्ये काँग्रेस पक्षाकडून आमदार झाले. 2014 साली त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढवली त्यातही त्यांना अपयश आले. 2019 मध्ये बदललेली राजकीय समीकरणे आणि परिस्थिती पाहून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणमधून काँग्रेसचे उमेदवार बाबा मिस्त्री यांना मिळालेल्या मतानंतर दिलीप माने यांनी शहर मध्य मतदारसंघात जात आणि काँग्रेस सोडल्याबद्दल चूक केली अशी ही चर्चा ऐकण्यास मिळाली.
आता पुन्हा दिलीप माने यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांचा वाढदिवस सर्वत्र साजरा होत आहे. यामध्ये दक्षिण विधानसभा मतदारसंघावर फोकस करण्यात आलाय. दिलीप माने यांनी पुन्हा काँग्रेस कडून विधानसभा लढवावी अशी ही मागणी समर्थक करीत आहेत.
परंतु मालकांच्या मनात नक्कीच चाललय काय? असाही प्रश्न समर्थकांमधून उपस्थित होतो, लोकसभा निवडणुकीनंतरचे निकाल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरणे आणि तयार होणारे वातावरण पाहूनच दिलीप माने हे निर्णय घेतील यात कोणतीही शंका नाही. तोपर्यंत तरी माने म्हणजे राजकीय वादळापूर्वीची शांतता असेच म्हणावे लागेल.