“एक बैठक माझी वसुंधरासाठी” या अभियानानिमीत्त बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सीईओ स्वामी बोलत होते. पुढे बोलताना सीईओ स्वामी म्हणाले,
औद्योगिक क्रांती नंतर मानवाने अनेक शोध लावले, मानवी आयुष्यात अनेक सुखसुविधा निर्माण केल्या परंतु हे करत असताना मानवाने निसर्गाची अपरिमीत हानी केली आहे. त्यामुळे आज आपणांस अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. निसर्गाचा ढासळलेला समतोल राखण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या वसुंधरेची काळजी घेण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांचे महत्व जाणून घेवून आपण आपल्या वसुंधरेची काळजी घ्यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
घन कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामस्थ उदासीन असल्याचे दिसते ते चित्र आता बदलले पाहिजे. या प्रसंगी कोरफळे गावातील 50 वर्षे जुन्या झाडांना हेरिटेज दर्जा देण्यात येऊन या वृक्षां जवळ फलक लावण्यात आले. यावेळी गावातील वाहनांची प्रदुषण चाचणी करण्यासाठी PUC संयंत्र कार्यान्वित करण्यात आले. त्याचे उद्घाटन सीईओ स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी माझी वसुंधरासाठी समस्त गावकऱ्यांना शपथ देण्यात आली. माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठी पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी विविध गीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणली.
याप्रसंगी सभापति अनिल (काका) डीसले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कौरव आप्पा माने, कोरफळे सरपंच सविता तानाजी शिंदे, उप सरपंच मुद्रुका रामभाऊ संसारे, सहाय्यक जिएसटी आयुक्त मुंबई प्रदीपकुमार आग्रे, गटविकास अधिकारी शेखर सावंत, जि.प.प्रा शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.
कोरफळे येथील कार्यक्रमानंतर पंचायत समिती बार्शी येथे सर्व अधिकारी, ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांची आढावा सभा घेण्यात आली.

















