कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अतिशय वाईट होती, केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल किंवा कुणालाही याचा अंदाज आला नाही, 25 ते 45 च्या वयोगटातील व्यक्ती या लाटेत कोरोना बाधित झाले, चांगले चांगले हे जग सोडून गेले, ऑक्सिजनची गरज, रेमडेसिव्हीर इंजेक्शन, बेड, व्हेंटिलेटरची गरज काय असते हे त्या लाटेने दाखवून दिले, आपण आरोग्य सुविधांमध्ये किती मागे आहोत हे सर्वांनाच समजले,
या लाटेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन अतिशय झोकून देऊन काम केले, यामध्ये काही अधिकाऱ्यांचे काम निश्चितच आठवणीत राहणारे ठरले. विशेष म्हणजे त्यावेळचे निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉ अग्रजा चिटणीस ही दोन व्यक्ती.
निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्या बदलीनंतर उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभारी पदभार दिला. अतिशय योग्य व्यक्तीकडे चार्ज गेल्याची भावना माध्यमातून व्यक्त झाली, त्या पदाला आणि कर्तव्याला वाघमारे यांनी साजेसे काम कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केलं आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या, त्यापैकी बऱ्याच जबाबदाऱ्या वाघमारे यांनी तितक्याच ताकदीने पेलल्या, त्यांचा या वाईट काळात कधी ही फोन बंद लागला नाही, ते बैठकीत असले तरी आपल्या व्हाट्सएपच्या स्टेटस वर मॅसेज टाकायचे मी बैठकीत आहे या या वेळेस उपलब्ध होईन, या कठीण काळात जिल्हा प्रशासन केवळ चार तास झोपत होतं, 24 तासांमध्ये तब्बल 18-18 तास प्रशासनाने काम केले आहे, बैठका, ऑनलाइन मिटिंग, ऑक्सिजनचा तुटवडा, रेमदेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा, बेडची कमतरता याचे रोज नियोजन व्हायचे, रेमडेसिव्हीर इंजेक्शनची जबाबदारी ही भारत वाघमारे यांच्यावर होती, प्रत्येक हॉस्पिटल मधील रुग्ण वाचला पाहिजे यासाठी इंजेक्शनचे नियोजन वाघमारे करत असत. दुसरी लाट थोपवण्यात जिल्हाधिकारी शंभरकर यांना भारत वाघमारे यांची नक्कीच भक्कम साथ राहिली हे कुणालाही नाकारता येणार नाही.
सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉ अग्रजा चिटणीस महिला डॉक्टर असतानाही फिल्डवर त्यांनी अत्यंत गांभीर्याने व निर्भयपणे काम केले, इतरांना मदत करण्याची त्यांची भूमिका ही कौतुकास्पद राहिली आहे, दुसऱ्या लाटेच्या वेळी पत्रकारांसमोर जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेल्या एक प्रसंग संवेदनशील होता. एक महिला, तिचा मुलगा, मुलगी हे पाणावलेल्या डोळ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आले, आत मध्ये जिल्हाधिकारी बैठक घेत होते, बाहेर काही पत्रकार व उपायुक्त धनराज पांडे हे थांबून होते,
तेव्हा पत्रकार नितीन पात्रे यांनी त्या महिलेची विचारणा केली, तिचा नवरा एका खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असून ते बायपॅपवर आहेत त्यांना तातडीने टॉसिलीझुमाब हे इंजेक्शन पाहिजे असे सांगितले म्हणून आम्ही इथे आलो, त्यावेळी हे इंजेक्शन महाराष्ट्रात उपलब्ध नव्हते, त्याचवेळी डॉ अग्रजा चिटणीस बैठकीला जाण्यासाठी आल्या पत्रकार पात्रे यांनी लगेच डॉ चिटणीस यांना थांबवले आणि त्या महिलेची अडचण ऐकण्यास सांगितले, त्यानंतर लगेच तुझे पेशंट सिव्हिल मध्ये हलवतेस का असे सांगून एक महिला म्हणून विश्वास दिला, माझ्यावर भरोसा ठेव मी लगेच बायपॅप बेड उपलब्ध करून देते म्हणून त्वरित बेड दिला, काही दिवसांनी तो रुग्ण बरा होऊन घरी गेला.
एका पत्रकारांचे 80 वर्षाचे चुलते कोरोना पॉझिटिव्ह झाले, त्यांची ऑक्सिजन लेव्हल 70 वर होती आता ऍडमिट कुठे करायचे असा प्रश्न होता तेव्हा त्या पत्रकाराने डॉ अग्रजा चिटणीस यांना फोन केला, त्यांनी लगेच फिव्हर ओपीडीला कॉल करून बेड उपलब्ध करुन दिले, ऍडमिट करेपर्यंत ऑक्सिजन लेव्हल 45 वर गेली मात्र तातडीने ऍडमिट करून ऑक्सिजन लावण्यात आले आणि 15 दिवसानंतर त्या 80 वर्षाच्या रुग्णाने कोरोनावर मात केली,त्यांना वाचवण्यात डॉ चिटणीस यांच श्रेय मोठे होते,
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लान्ट बसवण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून डॉ अग्रजा यांनी काम पाहिले, आज सिव्हीलमध्ये 4 ऑक्सिजन प्लांट उभे आहेत, तीन दिवसांचा ऑक्सिजन स्टॉक कायम इथे राहणार आहे.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कोरोनाच्या लाटेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान झाला त्यामध्ये भारत वाघमारे आणि डॉक्टर चिटणीस हे दोन अधिकारी या सत्काराचे आणि सन्मानाचे खरे मानकरी वाटतात.



















