सोलापूर : मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांच्यातील शीतयुद्ध आता जग जाहीर झाले आहे. उमेश पाटील हे राजन पाटील यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. या वादात आमदार यशवंत माने यांनीही उडी घेतल्याचे पहायला मिळाले आहे. शुक्रवारी आमदार यशवंत माने हे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले होते त्यांच्यासोबत माजी उपाध्यक्ष बाळराजे पाटील होते.
जिल्हा परिषदेमधून बाहेर पडताना पत्रकारांनी त्यांना गाठले आणि येण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी जलजीवन मिशनच्या आलेल्या अहवालानंतर कारवाई झाली पाहिजे, ज्या मक्तेदारांना पात्र असताना अपात्र केले आणि अपात्र असताना पात्र ते टेंडर पुन्हा नव्याने काढले पाहिजेत तरच त्या कारवाईला महत्त्व आहे. जर प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली तर मोहोळ तालुक्यातील सरपंच न्यायालयात जनहित याचिका दाखल करतील असा इशारा दिला.
यानंतर पत्रकारांनी त्यांना विधानसभेत जलजीवन वर काय चर्चा झाली असा प्रश्न विचारला. तेव्हा हा पक्षीय प्रश्न नाही सर्वपक्षीय आमदारांनी या विषयात लक्ष घातले आहे. मी सत्तेत असलो तर सरकारकडून निधी आणण्याची माझी भूमिका असते, विरोधात असलो तरी भांडून माझ्या तालुक्याला निधी आणतो. तेव्हा मालक तर तिकडे आहेत तुम्ही विरोधात कसे? असा प्रश्न पुन्हा केला असता ‘कुण्या बाजारबुनग्यां’मुळे मालक काय राष्ट्रवादी सोडतात का? असा उलट प्रश्न करत ते गाडीत बसून निघून गेले.

















