सोलापूर : ग्रामीण महिलांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाकडून उमेद अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. उमेद अभियानाची वचनबध्दता टिकवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सन 2021-22 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करीत 98.33 टक्के उद्दिष्ट साध्य करीत उमेद अभियानात राज्यात प्रथम स्थानावर झेप घेतली आहे.
ग्रामविकासामध्ये महिलांचा विकास हा महत्त्वाचा विषय असून यासाठी महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उमेद अभियानात सोलापूर जिल्ह्याने नेहमीच चांगले काम केले आहे. या वर्षात सोलापूर जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता गटाच्या महिलांना सक्षम बनविण्यासाठी व शक्य असेल त्या मार्गाने उपजीविका उभ्या करणाची मोहीम सीईओ स्वामी यांनी गतिमान करून स्वयंसहाय्यता गटांना तब्बल 186 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून 114 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले.उमेद अभियानाच्या माध्यमातून बचतगटांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून ग्रामीण भागातील महिलांना मोठा आर्थिक आधार देण्यातही सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर आहे.
यासाठी प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी जिल्हा व तालुकास्तरावर बॅंकेसोबत बैठका घेणे व तालुकास्तरावर कार्यशाळा आयोजित करणे यास्तरावर प्रयत्न केले.
तसेच संस्थिय बांधणी मध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत समूह ग्रामसंघ व प्रभागसंघ नोंदणी करण्यात सुध्दा राज्यात प्रथम रुक्मिणी सप्ताह राबवून बचतगटांच्या उत्पादीत मालास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
यामध्ये ब्रांडींग, पॅकेजिंग व बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी टाय अप करण्यासाठी मार्गदर्शन केले. ज्या गावात 15 पेक्षा जास्त बचतगट आहेत अशा गावात रुक्मिणी सप्ताह राबविण्यात आला.
यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केला होता.
प्रकल्प संचालक संतोष धोत्रे व उमेद अभियानातील अधिकारी व कर्मचारी व विविध समुह संसाधन व्यक्ती यांनी सन 2021-22 या वर्षात अत्यंत संवेदनशीलता दाखवून राज्यात प्रथम क्रमांकाचे काम केले आहे. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे प्रतिपादन यावेळी सीईओ स्वामी यांनी केले.
*चालू आर्थिक वर्षात बचत गटांच्या उत्पादनांचे ब्रॅंडींग करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सीईओ स्वामी यांनी सांगितले.*


















