सोलापूर : सुरत-चेन्नई हा ग्रीन फिल्ड महामार्ग अक्कलकोट तालुक्यातून जात आहे. जिल्हा प्रशासनाने शेती दराच्या नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये तुटपुंजा दर असल्याने शेतकऱ्यांमधून संतापाचे वातावरण आहे. अक्कलकोटचे माजी नगरसेवक महेश हिंडोळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी पुन्हा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली.
यावेळी सुरेखा होळीकट्टी, डॉ गुलापल्ली, नांनु कोरबू, सोमलिंग निंबाळ, चेतन जाधव, सिद्धाराम कोरे, शांतप्पा हौदे, भीमन्ना माळी, वाहिद नाईकवाडी, सुनील दसले, लक्ष्मीपुत्र तेलुनगी, जग्गनाथ कलमनी, बसवराज हंबलगी, शंभू आकातनाल, मजलीस बागवान, राजशेखर कुंभार, विजय चव्हाण, प्रशांत शिंदे, शिवाजी पाटील, मल्लिनाथ दसाडे, शिवयोगी ठक्का, संजय म्हंता आदींसह 300 शेतकरी उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना हिंडोळे म्हणाले, अक्कलकोट तालुक्यामध्ये जमिनीचे भाव किमान दहा ते पंधरा लाखाच्या वर एकरी आहेत असे असताना तीन ते पाच लाख रुपये दर मिळणे ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. नुकतेच एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला पाचशे किलो कांदा विकून दोन रुपये पट्टी मिळाली तशी थट्टा तर सरकार शेतकऱ्यांची करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्याला किमान 15 लाख रुपये एकरी दर मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा दिला.
मंगळवारी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली काही शेतकरी व संघर्ष समितीने निवेदन दिली असे असताना परत बुधवारी शेतकरी का आले? तुमच्यात गटबाजी आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता शेतकऱ्यांमध्ये कुठलीही गटबाजी नाही, प्रत्येक पक्षाचे नेते शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेत आहेत. जेवढा जादा मोबदला शेतकऱ्यांना मिळेल त्यासाठी हा प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण हिंडोळे यांनी दिले.



















