सोलापूरकरांनों हे आता नक्की वाचा ; जनतेच्या प्रश्नांना फुटली वाचा; निवडणुकीच्या तोंडावर रिक्षावरील बॅनर वेधताहेत लक्ष
सोलापूर, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच सोलापुरात मूलभूत प्रश्न निवडणुकीचे मुद्दे महत्वाचे ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहेत. शहरातील ऑटोरिक्षावरसध्या सोलापूरकरांच्या समस्यांचा पाढा वाचणारे बॅनर् झळकले असून शहर आणि जिल्ह्यात त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. रिक्षावरील या बॅनरबाजीमधून गेल्या अनेक वर्षांच्या सोलापूरच्या समस्यांचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याचे चित्र दिसत आहे.






सोलापूर शहरातील बहुतांश रिक्षांवर आवाज सोलापूरचा या कॅम्पेनचे बॅनर्स दिसून येत आहेत. यावर सरकारच्या आश्वासनांची पोलखोल करणारी शेरेबाजी करत सोलापूरी जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यात आली आहे. आवाज सोलापूरचा ही मोहीम कोणाकडून राबवली जात आहे, याची माहिती समोर आली नसली तरीही सोलापूरचा पाणी प्रश्न, स्मार्टसिटी, विमानतळ, रस्ते, कचरा प्रश्न अशा विविध समस्यांवर अस्सल सोलापुरी भाषेतून लोकांच्या भावना मांडल्याने सोलापूर नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेली अनेक वर्षे सत्ताधाऱ्यांकडून सोलापूरच्या विकासाची स्वप्ने दाखविण्यात आली.मात्र स्मार्ट सिटी सारख्या योजनेला 8-9 वर्षे होऊन देखील सोलापूरकराच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही.आता लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सोलापूरच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे बॅनर्स लागल्यामुळे राजकारणात सत्ताधाऱ्यांना आरसा दाखविण्याचा प्रयत्न या ऑटोरिक्षावरील बॅनर्समधून केलेला आहे.
गेली अनेकवर्षे सोलापूरकर विकासाच्या, स्मार्टसिटीच्या गप्पा ऐकत आहेत. मात्र,शहराचे प्रश्न ‘जैसे थे’ असल्याने त्याला या बॅनर्सद्वारे वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूरचे नागरिक देखील सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणावर संताप व्यक्त करत आहेत. निवडणुका आल्या की रंगबिरंगी विकासाची स्वप्ने दाखवून मतांची झोळी भरणाऱ्या पुढाऱ्यांवर सोलापुरी जनता प्रचंड नाराज आहे. हायटेक शहराचे स्वप्न दाखवणाऱ्यांना साधा पाण्याचा प्रश्न सोडविता न आल्याचा रोष जनतेत आहे. त्यातच मनातला रोष थेट रिक्षावरील बॅनरवरून व्यक्त झाल्याने लोकांच्या मनात मोठे कुतुहूल निर्माण झाले आहे.
सोलापूरात आता निवडणुकीचा रंग भरला जात असताना, लोकांच्या प्रश्नांना पुन्हा केंद्रस्थानी आणून लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न या लक्षवेधी रिक्षांनी केला आहे. त्यामुळे निवडणुकीत सोलापूरचा आवाज म्हणून समोर आलेला समस्यांचा पाढा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
काय आहेत बॅनर्सवरचे मुद्दे ?
सोलापूर हुणार हुती स्मार्टसिटी, १० वर्ष दिली.. अजून थांबायच किती?
पैसा खाल्ला रस्त्यामदी, सोलापूर घातलं खड्ड्यामदी !
स्वच्छ सोलापूर स्वप्नातच राहिलं, कचऱ्याचं साम्राज्य सगळीकडं पाहिलं !
कोल्हापूरला नवीन विमानतळ, सोलापूरकरा, तू ट्रेनमागच पळ !
स्वप्न दाखवलं पुण्याचं, हितं पाणी नाय धुण्याचं !
ग्रामीण भागातही बॅनरबाजी
दरम्यान, ग्रामीण भागात देखील अशाच प्रकारचे शेती आणि महागाईशी निगडीत प्रश्न उपस्थित करणारे बॅनर्स सोलापूर मतदारसंघात गावोगावी लावण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या या बॅनरबाजीने कुतुहूल निर्माण झाले आहे. तसेच याबद्दल समाधानही व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये पिकाला नाही भाव, शेतकऱ्यांना नाही किंमत बळीराजा या सरकारला दाखव तुझी हिंमत अशा आशयच्या बॅनर्स लावून शेतकऱ्यांना आगामी निवडणुकीत आश्वासनांचे गाजर दाखवणाऱ्या विरोधात हिंमत दाखवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतीउत्पन्नाता खर्च दुप्पट झाला आहे. पिकाला पाणी देण्यासाठी धरणातून वेळेत पाणी उपलब्ध होत नाही, पाणी मिळाले तर वीजेचा तुटवडा यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडून ब्र शब्द काढला जात नाही. शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून आवाज सोलापूरच्या या कॅम्पेनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारे बॅनर्स गावोगावी लावण्यात आले आहेत.