“मुळात मिलिंद या नावाचा अर्थच भाग्यवान, सृजनशील, गंभीर, सक्षम, आनंदी असा होतो. कोरोनाच्या संकटात दोन वर्षे आपल्या कुटुंबापासून दूर राहून,दोनवेळा कोरोना पॉझिटिव्ह होऊनही खंबीरपणे उभे राहिलेले मिलिंद शंभरकर. कलेक्टर या पदाचा रुबाब व थाटच वेगळा, परंतू वागण्यात त्या पदाचा अविर्भाव नसलेले शंभरकर, जिल्हाधिकारी असतानाही वयाने मोठ्या असलेल्या अधिकाऱ्यांला कायम सन्मानजनक वागणूक देणारे शंभरकर. प्रशासनाचा कारभार पारदर्शी चालवणारे शंभरकर. कामात संवेदनशीलता,संयम आणि प्रामाणिकपणा ठेवणारे शंभरकर”.
सोलापूर : कोरोना ही अशी जागतिक महामारी होती की, जिने खूप काही शिकवले. आपली कोण? परकी कोण हे सुद्धा समजले,चांगली माणसं सोडून गेली, जुनी माणसं बघताबघता निघून गेली. सर्वाधिक ताण होता तो प्रशासनावर. अशात सुद्धा दोन्ही लाटेशी लढणारा आणि अतिशय, पारदर्शी व संयमीपणे काम करणारा प्रशासकीय योद्धा म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे खंबीर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर.
20 जानेवारी 2019 रोजी शंभरकर यांनी सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतला. समाज कल्याण आयुक्त असल्याने निश्चित त्यांच्या कडून सामाजिक न्याय विभागाच्या बाबतीत चांगले काम होईल ही अपेक्षा होती, सुरुवात त्यांनी चांगली केली, पालकमंत्री दिलीप वळसे पाटील लाभल्याने कामाला गती आली, मात्र जगात कोरोना महामारीचे संकट सुरू झाले, भारतात कोरोनाचा शिरकाव झाला, देश लॉकडाऊन झाला, अशावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची होती. सोबतीला महापालिका आयुक्त दीपक तावरे होते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ होते, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले होते..
शहर व जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला, रुग्ण वाढले, मृत्यू वाढले, सिव्हील हॉस्पिटल वर लोड वाढला, खाजगी रुग्णालये सुरू करण्यात आली, दीपक तावरेंचा पहिल्या लाटेत प्रशासकीय बळी गेला. शंभरकर मात्र खंबीर राहिले. आयुक्त शिवशंकर यांची चांगली साथ लाभली. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या पहिल्या लाटेशी सामना केला, बेडचे महत्व पहिल्या लाटेत समजले. पालकमंत्री दत्तामामा भरणे यांची खंबीर साथ होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मात्र ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसीवीर इंजेक्शनने चांगलेच हैराण केले, परिस्थिती इतकी वाईट होती की जिल्हा प्रशासन 24 तासांपैकी 18 ते 20 तास काम करायचे, कधी ऑक्सिजन संपते, कधी इंजेक्शन संपतील याचा पत्ता लागायचा नाही, ऑक्सिजन साठी रात्र जागून काढावी लागत असत.
जिल्हा परिषदेला दिलीप स्वामी आले, पोलीस अधीक्षक पदी तेजस्वी सातपुते आल्या, निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून भारत वाघमारे होते, शहरात उपायुक्त धनराज पांडे, सिव्हील अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर, डॉ अग्रजा चिटणीस, डॉ प्रसाद, डॉ धडके, पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर,उपायुक्त बापू बांगर या सर्वांनी जीवाचे रान करून सोलापूरकरांना वाचवले.
आता संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑक्सिजनचा मुबलक साठा आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये दोन ऑक्सिजन प्लांट असून एक हवेतून ऑक्सिजन घेणारा प्लांट आहे. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात असे प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांट बसवण्यात आले आहेत. सरकारी दवाखान्याचा एकही बेड आता बिगर ऑक्सिजनचा नाही इतकी तयारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. लसीकरणाच्या बाबतीत ते कायम गंभीर असतात, नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी त्यांची तळमळ दिसून येते, त्यांचा फोन कधीही बंद नसतो, हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले सांगतात.
प्रशासकीय कामकाजात त्यांनी अनेक सुधारणा केल्या, डिजिटल सातबारा, फेरफार ऑनलाइन यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली, एका दिवसात 10 हजार फेरफार करण्याचे रेकॉर्ड सोलापूरने केले. मतदार नोंदणीत सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला याचे श्रेय प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना जाते, एखाद्या कामाचा पाठपुरावा करणे, बैठका लावून आढावा घेणे हे त्यांच्या कामाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
कुंभारी इथल्या 30 हजार घरकुलांच्या रे नगर प्रकल्पाचा आढावा कायम असतो, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात,घरकुल लाभार्थ्यांना बँक कर्ज मिळण्यासाठी बँकांशी कॉर्डिनेट करून केंद्राशी कम्युनिकेशन साधत असतात. असे तहसीलदार अमोल कुंभार सांगतात.
जिल्हाधिकारी कार्यालय अभ्यागतांसाठी कायम खुले असते.प्रत्येकाला भेटल्याशिवाय ते जात नाहीत. एखादा सर्वसामान्य, गरीब नागरिक प्रश्न घेऊन आला की तो प्रश्न सुटेपर्यंत त्याचा ते पाठपुरावा करतात.
झेडपी सीईओ दिलीप स्वामी म्हणाले, मला नुकतेच वर्ष पूर्ण झाले मात्र या वर्षात सरांसोबत काम करताना जाणवले,त्यांची अतिशय उत्कृष्ट कार्यप्रणाली असते, कामाचा अभ्यासपूर्ण निपटारा ते करतात ,अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्त्व असून कोरोना काळात रात्रीचा दिवस करून संपूर्ण यंत्रणेला सोबत घेऊन मार्गदर्शन करून कोरोना वर प्रभावी मात केली. सरांना शुभेच्छा.
उमेश पाटील म्हणतात, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे अतिशय सकारात्मक अधिकारी असून त्यांच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण झाली त्यांचे मनापासून अभिनंदन, सर्व घटकांसाठी ते बैठका लावतात, प्रश्न समजून घेतात, मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन योजना, घाटने बॅरेज, पत्रा चाळीचा प्रश्न, मोहोळ क्रीडा संकुल प्रश्न , यावली या भागातील डोंबारी समाजाच्या घर आणि जागेच्या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठका लावल्या आहेत.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणतात, पालकमंत्री म्हणून काम करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांच सहकार्य खूप महत्वाचे आहे. या पावणे दोन वर्षात सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद सांभाळताना जिल्हाधिकारी शंभरकर यांचं कामकाज जवळून पाहता आले, प्रत्येक प्रश्न,विषय जाणून, समजून घेणारे आणि तितक्याच गंभीरपणे तो प्रश्न सोडवण्याची उत्तम कार्यपद्धती आहे. शांत,संयमी,पारदर्शक त्यांचा कारभार आहे. कोरोना लाटेत त्यांनी केलेले काम पाहता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचा अभिमान वाटतो.


















