दुःखद ! बसावारुढ मठाचे संस्थापक सदगुरू आप्पाजी यांचे निधन
सोलापूर दि. २९ मे २०२५ — कस्तुरबा नगर येथील श्री बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक व प्रमुख आध्यात्मिक मार्गदर्शक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामी (आप्पाजी) यांचे आज लिंगैक्य झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून, भक्तवर्ग, साधूसंत व अध्यात्मिक विश्वामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आप्पाजींचे पार्थिव गुरुवार, दिनांक २९ मे २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी श्री बसवारूढ मठ, कस्तुरबा नगर (विमानतळाच्या मागे), सोलापूर येथे ठेवण्यात येणार आहे.
समाधीविधी गुरुवारी सायंकाळी सुमारे ४.०० वाजता मठ परिसरात पार पडणार आहे.
श्री ईश्वरानंद महास्वामी यांनी समाजाला अध्यात्म, सेवा, निस्वार्थ भाव आणि भक्तीमार्ग यांचे महान मूल्य शिकवले. त्यांची साधी राहणी, गाढ ध्यानस्थ वृत्ती आणि प्रेमळ मार्गदर्शन यामुळे ते हजारो भक्तांच्या श्रद्धास्थानी होते. त्यांनी स्थापन केलेल्या श्री बसवारूढ मठाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले.
त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या कार्याचे स्मरण आणि आदरांजली म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर येणार असल्याची माहिती मिळाली आहे.