खासदार प्रणिती शिंदे यांचा बोलताना माईक केला बंद ; संसदेत का झाल्या आक्रमक
सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे या संसद अधिवेशनातील प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होऊन सरकारला धारेवर धरले. यावेळी आपले विचार व्यक्त करताना देशात शेतकरी शेती का सोडत आहेत हे त्यांनी संसदेच्या समोर आणले. पुढे बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्रात तीस हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकरी आंदोलनात सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हे संसदेच्या निदर्शनास आणून देत असताना माझा माईक बंद केला गेला.
आज देशात आणि महाराष्ट्रात प्रधानमंत्री फसल बिमा योजना कंपन्या मनमानी करत आहेत, वेळेवर पंचनामे होत नाही, पाऊस झाला नाही म्हणून कंपन्या सांगतात, अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळत नाही, दुधाला दर, शेतीमालाला हमी भाव नाही, साखर कारखान्यांकडून उसाचे बिल वेळेवर दिले जात नाही, शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नाही, पी.एम. किसान योजनेच्या माध्यमातून अतिशय तुटपुंजे मदत दिले जाते त्यात खताचे पोते तरी येते काय? असा सवाल केला.
भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आल्यामुळे शेतकरी अडचणीत येऊन आत्महत्या करत आहेत. यावर उपाययोजना न करता भाजप सरकार शेतकऱ्यांवर जाणूनबुजून अन्याय आणि अपमान करत आहेत. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडत असताना माईक बंद करून आमचा आवाज दाबला जातोय असा संताप त्यांनी सरकारवर व्यक्त केला.