सोलापूरचा दुष्काळ पुसण्याचा प्रणिती शिंदेंचा पहिला प्रयत्न ; या संस्थेचा पुढाकार, कोणता आहे हा प्रोजेक्ट
सोलापूर – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता मोहोळ, मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी भागात जलसंधारणाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून चेन्नई येथील एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया ( EFI) या संस्थेच्या वतीने सीएसआर अंतर्गत जलसंधारणाचे काम सुरु केले जाणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला , खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह, E.F.I या संस्थेचे संस्थापक अरुण कृष्णमूर्ती. सी.आदी मान्यवर उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेला संबोधित करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर जिल्हा हा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट तालुक्यातील काही भाग अद्यापही दुष्काळीच आहे. या भागातील दुष्काळाचा डाग पुसावा यासाठी जलसंधारणाच्या योजना राबवाव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. दरम्यान, गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना मी मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासह अक्कलकोट आणि मोहोळ तालुक्यातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. त्याशिवाय काही पर्यावरणप्रेमी संस्थांच्या माध्यमातून देखील जलसंधारणाची कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या जलसंधारणाच्या कामासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून चेन्नई येथील पर्यावरणप्रेमी फाउंडेशन ऑफ इंडिया (EFI) ही संस्था सोलापूर जिल्ह्यातील जलसाठे पुनर्संचयित करण्याचे काम हाती घेणार आहे. ही सर्व कामे सामाजिक जबाबदारी अंतर्गत केली जाणार असून यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी घेतला जाणार नाही. सुरुवातीला या संस्थेकडून सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ तालुक्यातील वाफळे, अक्कलकोट तालुक्यातील गाव तसेच मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी-दहिवडी आणि डोंगरगाव या गावांतील जलसाठे पुनर्संचयित करण्याचे काम केले जाणार आहे.
पर्यावरणप्रेमी फाउंडेशन ऑफ इंडिया (E.F.I) ही वन्यजीव संवर्धन आणि अधिवास पुनर्संचयन संस्था आहे, जी देशातील १८ राज्यांमध्ये कार्यरत आहे. दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळावर मात करण्यासाठी या संस्थेचे प्रमुख अरुण कृष्णमूर्ती. सी यांच्याशी चर्चा करून नंतर जलसंधारणाच्या कामाला गती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनतर या संस्थेच्या वतीने सर्वेक्षण करुन वाफले,, लक्ष्मी-दहिवडी आणि डोंगरगाव या गावातील जलसाठे दत्तक घेऊन त्यांचे पुनर्संचयन करण्याचा निर्णय घेतला आहे.
*असे होणार काम*
• तलावांमधील कचरा, अवशेष आणि अतिक्रमित वनस्पतींचे स्वच्छता कार्य
• तलावांचे गाळनिर्मूलन आणि खोलीकरण करून पाणी साठवण क्षमता वाढवणे
• जलभरण विहिरी, पक्षी निवास द्वीपे आणि झिरप गटारांची निर्मिती
• पावसाळ्यानंतर स्थानिक प्रकारच्या वनस्पती लावणे
• तलावात येणाऱ्या प्रवाहाचे आणि अतिरिक्त पाण्याच्या नियंत्रणाचे व्यवस्थापन केले जाणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील २४ दुष्काळी गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे या सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधेवेशनात त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांच्या पाणी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला तत्काळ मंजुरी दिली होती. तसेच खासदार शिंदे यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्नांवर आवाज उठवला होता. आता पाणी फौडेशन, जलयुक्त शिवार या योजनेच्या धरतीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी पर्यावरणप्रेमी संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून घेण्यावर भर देताना दिसुन येत आहेत.
या पत्रकार परिषदेस पर्यावरणप्रेमी फाउंडेशन ऑफ इंडिया (E.F.I) चे अरुण कृष्णमूर्ती सी.,
जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, संदीप पाटील, मनोज यलगुलवार, रवी कोळेकर, तिरुपती परकीपंडला, ग्रामस्थ सुधाकर कांबळे, महादेव कोळी, मारुती बोरकडे, सत्यवान शिंदे, मोहन घोडके, राजेंद्र सर्जे, दिलीप वागज, पुष्पक सोनवले, मनोहर लिगाडे, प्रमोद भगत, प्रशांत पाटील, बजरंग शिंगाडे, पांडुरंग हेंबाडे, यांशवंत आकळे, सुखदेव मोरे, तानाजी मोरे, नंदकिशोर शिंदे, गणपत आकळे, बक्करभाई मुजावर, जयप्पा सपनाळे, अनिल मोरे, पिंटू शिंदे, शिवानंद कुरमुले, यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.