सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील एका सरपंचासह इतर चार ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई केली आहे. त्यापैकी एकाला तर पुढील पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या न्यायालयात ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेवर सुनावणी झाली. त्यामध्ये पाच ग्रामपंचायत सदस्यांना त्यांनी अपात्र केले आहे त्यात एका सरपंचाचा समावेश आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी या ग्रामपंचायतील संगप्पा चंद्रप्पा कोळी, रत्नाबाई मलकारी कोळी व संगव्वा चंद्रकांत कोळी या तीन सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना अपात्र करण्यात आले आहे. तसेच दौलतबी रज्जाक मुल्ला यांनी निवडणूक खर्च विहित रीतीने सादर न केल्याने त्यांचे सदस्यपद अपात्रतेसह त्यांना पुढील पाच वर्षे कालावधीसाठी निवडणूक लढविता येणार नाही.
यासह पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील सरपंच विश्वनाथ श्रीमंत कोळी यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्य पद व सरपंच पद अपात्र केले आहे.