सोलापूर : राज्य शासनाने 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल अठरा महिन्यानंतर आज शाळेची घंटा वाजली. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील एस.व्ही.सी.एस हायस्कूल येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यांनी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. स्वामी यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे उत्तरे दिली. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होता.
सोलापूर जिल्ह्यात एकूण 5 लाख 58 हजार विद्यार्थी आहेत. त्यापैकी आज पहिल्या दिवशी 48 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शासनाच्या निर्देशानुसार एका बेंचवर एक अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. एक दिवसाआड विद्यार्थ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. सुरू झालेल्या सर्व शाळांमध्ये शिक्षकांची 100 टक्के उपस्थिती होती. स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम शाळा बंद असताना लोकसहभागातून राबविल्याने सव्वा दोन हजार शाळा स्वच्छ झाल्या आहेत.
श्री. स्वामी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. त्यांनी वर्गात कोविडविषयक घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होटगी व उत्तर सोलापूर तालुक्यातील मजरेवाडी शाळेला स्वामी यांनी भेटी देऊन आढावा घेतला. यावेळी होटगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हत्याळीकर, उपशिक्षक पतंगे, सय्यद, ठाकूर, उपशिक्षिका कुलकर्णी, ढंगे, वनस्कर, जगताप, मजरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उषा सुरवसे, पदवीधर शिक्षक शकीला इनामदार, प्रकाश राज शेट्टी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैरप्पा कुरे, केंद्रप्रमुख सी.रा. वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी आदी उपस्थित होते.




















