सोलापूर | जिल्ह्यातील राजकीय विरोधक संजयमामा शिंदे यांना शह देण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर घडवून आणण्यात अकलूजच्या मोहिते पाटलांचा पुढाकार दिसला, अनेक वर्षांच्या गॅप नंतर मोहिते पाटलांची झेडपीत वाहवा झाली, झेडपीत सत्ता आली मात्र पदाधिकाऱ्यांची तोंड चार दिशेला आहेत, कुणाचं कुणाशी जमत नाही, पटत नाही, काम व्यवस्थित होत नाहीत, फायलींवरून खटके उडत आहेत, बिचारा अध्यक्ष कांबळे गरीब माणूस त्यांच्या असून अनेकजण आपली पोळी भाजून घेण्याच्या नादात असतात, मात्र कांबळेंचा सारथी अजितदादाला(तळेकर) हे पटत नाही ते सर्व बाबींवर बारीक लक्ष ठेवून असतात. अजितदादांची अनेकांना अडचण होऊ लागली, हा सर्व मामला पोहोचला भाजपच्या दरबारात. दरबार भरवायचा ठरला, तीन वर्षात ‘नंदादीप’वर न आलेल्या भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावली आठ पैकी 7 आमदार व 2 पैकी 1 खासदार आले, महाराज आले, बापू पहिल्यांदाच आले, दोन मालक आले, भाऊ आले, चार दादा आले, बैठक झाली, अधिकारी येऊन गेले, अजितदादांना जादा कामकाजात ‘इंटरफेअर’न करण्याच्या सूचना दिल्या गेल्या, तेव्हा पासून तळेकर जपूनच झेडपीत वावरतात.
आमदार प्रशांत परिचारक व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर झेडपीची जबाबदारी दिली गेली, दर सोमवारी एकाने झेडपी मध्ये येऊन पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवायचे, आपल्या सदस्यांची कामे करून घ्यायची असे ठरले, एका सोमवारी कुणीच आले नाही, दुसऱ्या सोमवारी योगायोगाने आमदार राजाभाऊ राऊत येऊन गेले, प्रशांत मालक काही आलेच नाहीत अशा बातम्या आल्या, नंतर ते आले, सर्वांची भेट घेतली, त्याचवेळी विजय मालक पण आले. सचिन दादाही आले, पण पुढच्या सोमवारी समाधान दादा झेडपीच्या गेटवर आले आणि बाहेरूनच निघून गेले, पुढे परत सोमवारी कुणीच नाही, महिना दीड महिना झाला, आमदार रणजित दादा अजूनही आले नाहीत.
जिल्हा परिषदेत भाजपच्या समविचारी आघाडीत अजून पण मेळ जमलेला नाही, पदाधिकाऱ्यांच्या पीए ला काढण्यापर्यंत प्रकरणे गेली आहेत, विशेष म्हणजे विरोधक बाजूलाच आहेत, समविचारी मध्येच फायलींवरून भांडणं सुरूच आहेत, परंतू हे वाद न होता समन्वयाने काम करण्याचा सल्ला कुणीच देत नाही….होत असलेला वाद, धुसफूस हे या कार्यकाळातील पदाधिकाऱ्यांचे दुर्दैव आहे.


















