सोलापूर. दि.२० – केंद्र शासनाच्या ८ वर्षे सेवा सुशासन गरीब कल्याण योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मल्टीमीडिया प्रदर्शन उपयुक्त असून जनतेने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूरच्या वतीने श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित होम मैदानावरील प्रदर्शनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, प्रकाशन विभागाचे उपसंचालक उमेश उजगर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, देवस्थानाचे विश्वस्त बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळवे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक राजशेखर पाटील, निवृत्त अधिकारी सतीश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री शंभरकर म्हणाले, या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा देदीप्यमान कामगिरी केलेल्या अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास येथे बघू शकतो.
यावेळी काडादी म्हणाले, नवीन पिढीला स्वातंत्र्य चळवळीतील इतिहासाबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे प्रभावी माध्यमाद्वारे त्यांच्यासमोर स्वातंत्र्य चळवळीतील इतिहास ठेवणे गरजेचे आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय इतिहास पाहता येईल. या प्रदर्शनामध्ये जनकल्याणकारी योजनांची माहितीचा उपयोग लोकांनी करून घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.
हे प्रदर्शन सर्वांसाठी पाच दिवस मोफत आहे. तसेच सदरील प्रदर्शन आपल्याला व्ही आर आभासी तंत्रज्ञानावर आधारितही पाहता येणार आहे. आजादी क्युस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्याना गेमिंग अपद्वारे आकर्षक बक्षिस आणि ई-प्रमाणपत्र ही जिंकता येणार असल्याचे श्री अंकुश चव्हाण यांनी प्रास्ताविकेमध्ये सांगितले.
प्रदर्शनाच्या स्थळी प्रकाशन विभागाची अनेक विषयावरील दर्जेदार पुस्तके वाचकांना विशेष सवलतीच्या दरात या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विध्यार्थी, विविध विषयांचे अभ्यासक आणि जिज्ञासूंसाठी ही पुस्तके अतिशय उपयुक्त आहेत. प्रदर्शनकाळात पुस्तकांच्या खरेदीवर किमान 10 ते कमाल 60 टक्क्यापर्यंत सवलत दिली जाणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा त्यात समावेशआहे. प्रकाशन विभाग ही भारत सरकारची एक प्रमुख प्रकाशन संस्था असून इतिहास, कला, साहित्य, संस्कृती, अर्थ, विज्ञान आणि क्रीडा, गांधीसाहित्य, बालसाहित्यअशा विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके तसेच राष्ट्रीय नेत्यांची भाषणे, मान्यवरांची चरित्रे यांचा विपुल संंग्रह प्रकाशन विभागाकडे अतिशय वाजवी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय योजना, कुरुक्षेत्र, बालभारती आणि आजकल ही मासिके या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतील आणि त्यांची वर्गणीदेखील स्वीकारली जाणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंबादास यादव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, ग्लोबल मिडिया संस्थेच्या विज्ञा रॉय आणि भूषण डोळस यांनी परिश्रम घेतले. पाच दिवसाच्या कालावधीमध्ये सकाळी ११:३० ते दुपारी ०३:०० वाजे पर्यंत भैरव मार्तंड व जयभवानी कलापथकाचे मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहता येणार आहे.