सोलापूर : महाराष्ट्रातील मुस्लिम समाजावर होणारे अन्याय, अत्याचार व हत्या याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी सोलापूरच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला. दरम्यान हा मोर्चा विजापूर वेस भागात आला असता याच वेळेस मुसळधार अशा पावसाने हजेरी लावली.
तशा भर पावसात भिजत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. या पावसात सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. जोरदार घोषणाबाजी सुरू होती. मोर्चा जिल्हा परिषदेच्या पुनम गेट समोर आला असता त्या ठिकाणी त्याचे सभेत रूपांतर झाले.
जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड, अनिरुद्ध वाघमारे, प्रशांत गोणेवार, पांडुरंग खांडेकर, श्वेता राजगुरू, पल्लवी सुरवसे, सुरज आरकराव, ज्योतिर्लिंग स्वामी, पुष्पा गायकवाड दर्शना गायकवाड, मंदाकिनी शिंगे, हेमा वाघमारे, आशालता आव्हाड, सरिता कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला वंचित बहुजन आघाडी कायम मुस्लिम समाजाच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली.


















