सोलापूर : विधानसभा निवडणुक अजून दीड वर्ष असली तरी काही पक्षांनी आता पासूनच मोर्चेबांधणी सुरु केली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या शहर मध्य या मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती स्थानिक कार्यकर्त्यांमधून मिळाली. शहर मध्य भागात राहणारे जिल्हाप्रमुख मनिष काळजे हे सुध्दा इच्छूक असल्याची माहिती आहे. तसेच राज्याच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना शहर मध्य मधून शिवसेनेने उमेदवारी द्यावी मागणी मोची समाजातून होत आहे.
सोलापूर शहरात शिवराज्याभिषेक दिनाचे मोठं मोठे डिजिटल लावण्यात आले आहेत. त्या फलकांवर शिवाजी सावंत यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. सात रस्ता परिसरात ते पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी माढयाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात 2004, 2009 आणि 2014 साली शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली आहे. या तिन्ही निवडणुकांमध्ये शिवाजी सावंत यांनी चांगलीच टक्कर दिली मात्र सुमारे पन्नास हजाराच्या मताधिक्याने त्यांचा पराभव झाला होता.
जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून विशेष करून शहर मध्यसाठी 5 कोटींच्या निधीची मागणी केली असून त्यापैकी 1 कोटींची कामे मंजूर झाली असल्याचे समजले. प्रा. ज्योती वाघमारे या मोची समाजाच्या आहेत, काँग्रेसच्या विजयामध्ये मोची समाजाचा वाटा महत्त्वाचा असतो, त्यामुळे वाघमारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट द्यावे अशी मागणी होत आहे.
सोलापूर शहर मध्य हा मतदार संघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो 2009, 2014 आणि 2019 या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी हॅट्रिक साधली आहे. युतीमध्ये ही जागा शिवसेनेला जाते. आता राज्यात भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेची महायुती आहे. त्यामुळे शहर मध्य ची जागा शिंदे गट आपल्याकडे घेण्याच्या तयारीत असून प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी जोरदार तयारी सुरू केल्याचे समजते.
सावंत हे आठवड्यातून किमान तीन-चार दिवस शासकीय विश्रामगृहात तळ ठोकून असतात, शहर मध्य मतदारसंघात चाललेल्या प्रत्येक घडामोडींवर ते लक्ष ठेऊन आहेत. तसेच जिल्हा परिषदेमध्ये ही कार्यकर्त्यांच्या कामासाठी ते ये जा करतात. राज्यातील मंत्रिमंडळात प्रा. तानाजी सावंत हे वजनदार नेते आहेत. ते आपल्या बंधू साठी निश्चित तिकीट आणू शकतात. परंतू माढयातून येऊन शहरात ते कितपत टिकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



















