काँग्रेसच्या सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी काँग्रेस भवनात एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदे दरम्यान त्यांनी “प्राण जाये पण पाणी न जाये” अशी भूमिका मांडतानाच नकळत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याला विरोध दर्शवला.
शहरातील पाणीपुरवठयावरूनही ही त्यांनी महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपला टार्गेट केले, समांतर जलवाहिनीसाठी 50 कोटीचा तरतूद होती मात्र आता ती 130 कोटी वर गेल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केला जातोय शहराला वेठीस धरले जातंय असा आरोप त्यांनी महापालिकेतील भाजप सत्ताधाऱ्यांवर केला.
पालकमंत्री भरणे यांच्यावर सोलापुरातून संताप व्यक्त होत असतानाच त्यांना बदलण्याची मागणी पुढे आली विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करा अशी मागणी केली होती त्यावर पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री पदाचा विषय काढला असता मी राजकारणात मंत्रीपद घेण्यासाठी आले नाही माझ्या मतदारसंघातील जनतेची कामे हीच माझी भूमिका राहिली आहे सध्या मी जे काम करते ते मंत्रिपदाचा लेव्हलचे आहे, त्यामुळे मंत्रीपद मला गरजेचे वाटत नाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मला पालकमंत्री करावं ही जी भूमिका मांडली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे असेही त्या मिश्कीलपणे म्हणाल्या.
राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी सुमारे पाचशे कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे या सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्यात येणार आहे हे पाणी बॅक वॉटर असेल की सांडपाण्यावर प्रक्रिया करून असेल ते मिळणार असल्याचं इंदापूर चे राष्ट्रवादीचे आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा सांगत आहेत पाच टीएमसी पाणी इंदापूरला जाणार हे समजल्यानंतर सोलापूरच्या अनेक नेत्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली, अनेकांना राजकीय विरोध करण्यासाठी विषय मिळाला, असे अनेक जण भरणेमामा वर तोंडसुख घेत आहेत.
पालकमंत्री भरणे मामा ओरडून सांगत आहेत सोलापूरला असलेल्या नियोजित पाण्याला हात न लावता उजनीतून पाणी घेतले जाईल खरे तर या प्रकरणात उजनी धरण हे कधी शंभर टक्के भरते तर कधी 120 टक्के. मात्र धरणाचे नियोजन हे शंभर टक्के पाण्यावर झालेले असते तसे पाहिले तर इंदापूर तालुक्याचा बराच भाग या धरणाला जोडून आहे मात्र सोलापूर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी किती टीएमसीचे नियोजन आहे, एनटीपीसी प्रकल्पासाठी उजनी धरणातून पाईपलाईन आणली आहे त्यांना किती टीएमसी दिले जाणार आहे, भीमा नदीवर विविध मोठ्या गावच्या पाणीपुरवठा योजना आहेत त्यांच्यासाठी किती पाणीसाठा नियोजित आहे, सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रासाठी किती पाण्याचे नियोजन आहे, सीना नदी मध्ये किती पाणी वर्षाला सोडले जाते, विविध कालवा तसेच विविध उपसा सिंचन योजना, सीना माढा योजना यांना वर्षाला किती पाणी नियोजित ठेवण्यात आले आहे ,याची माहिती मात्र कुणीही देत नाही ऊठसूट पालकमंत्री भरणे यांच्यावर तोंडसुख घेत आहेत सोलापूर शहराला उजनी वरून थेट जलवाहिनी आहे, औज बंधाऱ्यातून शहराच्या भागाला पाणी पुरवठा होतो तसेच हिपरगा तलावातून शहराचा काही भाग पाणी पितो मात्र या जलवाहिनी मध्ये अनेक गळत्या आहेत उजनी वरूनच दुसरी समांतर जलवाहिनी शहरासाठी टाकण्यात येत आहे मात्र त्याचे काम रखडल्याने निधी वाढत चालला आहे 2014 नंतर भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात होते त्यांनी या समांतर जलवाहिनी साठी किती प्रयत्न केला किती निधी दिला हासुद्धा मोठा विषय आहे. भीमा नदीत पाणी सोडले तर ते पहिल्या पन्नास किलोमीटरवर पाण्याचा प्रवाह मोठा असतो नंतर हे पाणी कमी होत जाते तसे पाहिले तर टेल टू हेड असा नियम असताना पाणी मोहोळ तालुक्याचा पुढे जातच नाही, सिनेत पाणी सोडल्यानंतर ते तिऱ्हे गावाच्या पुढे जातच नाही, औज बंधारा हा कर्नाटकला लागून असल्याने त्या बंधाऱ्यातील 60 टक्के पाणी हे कर्नाटकचे शेतकरी उचलतात त्यामुळेही शहराला पाणी प्रश्न भेडसावतो तो जर बंधारा वडापूर जवळ केला तर पाण्याचे योग्य नियोजन होईल.




















