सोलापूर : एकमेकांवर जवळपास चार वाहने धडकल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन ते चार जण जखमी झाले. दरम्यान मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.
बाळे ब्रीज चढतानाच्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी जवळ कंटेनर थांबली त्याला पाठीमागून ट्रक, कार आणि दुचाकीने धडक दिली त्या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले. यात बहूतेक दुचाकीवर आलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
घटना घडतात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हे दाखल झाले. पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदी पॉईंटमुळेच अपघात झाल्याचा आरोप करत आक्रमक शिवसैनिकांनी सोलापूर पुणे महामार्ग काही वेळसाठी रोखून धरला. शिवसैनिकांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे सोलापूरकडे जाणारी वाहतुक काही काळ थांबली, त्यामुळे वाहनाच्या लांब रांगा होत्या.
ही माहिती कळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिवसेनेचे अमोल शिंदे यांच्याशी चर्चा करून नाकाबंदी पॉईंट दुसरीकडे हलवून दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आला. मृतदेह आणि जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे हलवण्यात आले.
दरम्यान बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी बाळे येथे नाकाबंदी केल्याची माहिती मिळाली मात्र चिरीमिरी घेण्यासाठी पोलीस चुकीच्या पद्धतीने वाहने अडवतात, यामुळे आज एका कुटुंबाचा बळी गेल्याचा आरोप शिवसेनेचे अमोल शिंदे यांनी करत घडल्या प्रकाराची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तक्रार करणार असल्याचे सांगितले.



















