दत्ता थोरे । 9922930208
सोलापूरचे ग्राममदैवत शिवयोगी श्री. सिध्देश्वर यांच्या यात्रेनिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे सोलापूर दौर्यावर आले आहेत. त्यांच्या दौर्याचा पहिला दिवस हा शिवयोगी सिध्देश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंग़ावरील तैलाभिषेकाचा दिवस होता. सोलापूरचे भाविक भक्तीभावात रममाण होते. हा तैलाभिषेक करताना भाविकांनी ओतलेले शिवलिंगावरील तेल ओघळायच्या आधीच विखे-पाटील यांनी, ज्या ग्रामदैवताच्या यात्रा उत्सवासाठी ते आले आहेत, त्यांच्याच नावाने सुरू असलेल्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रशासन गतीमान असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ही बातमी पसरताच चिमणी पाडण्यासाठी आसुसलेल्या छोटा चेतन आणि त्यांच्या काऊंटर गँगने त्यांना गाठून लागलीच सत्कारही केला. जणू काय आता चिमणी पडलीच या अविर्भावात ही गँग असावी. पण आमचे या गँगला आणि खुद्द पालकमंत्री विखे-पाटील यांना नम्र विनंती आहे की चिमणीचा वाद विनाकारण वाढणार नाही याची खबरदारी त्यांनी घ्यायला हवी. कारखाना काही धर्मराज काडादींच्या मालकीचा नाही. ते विश्वस्त असून कारखाना 28 हजार शेतकरी सभासदांच्या मालकीचा आहे. काडादी फक्त विश्वस्त आहेत. चिमणी पाडून सिध्देश्वर कारखाना बंद करण्याचे सोलापुरातील एका चांडाळ चौकडीचे षडयंत्र ओळखून पालकमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे. चिमणी ठेवून विमानसेवा सुरू करावी, आणि बोरामणी विमानतळासाठी आवश्यक असलेली जमीन वनविभागाकडून काढून तत्काळ विमानतळ प्रशासनाकडे सुपूर्द करीत बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावावा. त्यांचे असे वागणेच पालकमंत्री या पालकत्वाच्या भूमिकेला साजेसे आहे.
जर पालकमंत्री चिमणी पाडूनच व पर्यायाने सिध्देश्वर कारखाना बंद करूनच होटगी रोड विमानतळावरून जर विमानसेवा सुरू करणार असतील तर त्यांनी आधी 28 हजार शेतकरी सभाषद आणि दहा हजार कामगारांच्या थडग्यासाठी जागा शोधून ठेवावी. या कारखान्याचे मूळ मालक असलेले सभासद शेतकरी आणि कामगार रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत चिमणीला लष्कर जरी आले तरी धक्का लागू देणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
पालकमंत्री विखे – पाटील यांना आमचे आणखी एक सांगणे आहे की राज्यकर्त्यांने कायम आईसारखे असले पाहीजे. आईला चार बाळे असतील तर आई तिचे जे सर्वात दुबळे बाळ आहे, त्याचे जास्त लाड करते. ज्या विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना काढून महाराष्ट्राला सहकाराचा कानमंत्र दिला, त्यांचाच वारस साठ वर्षे चाललेला जिल्ह्यातील सिध्देश्वरसारखा ‘सहकारी कारखाना’ उध्दवस्त करण्याची भाषा करतो, मुळात हेच अचंबित करणारे आहे. त्यांचे हे विधान ऐकून स्व. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्यासुध्दा काळजाचा ठोका चुकला असेल. पालकमंत्र्यांना कोण प्रिय आहे? काडादींचा केसही वाकडा करता येत नाही, म्हणून त्यांना खिंडीत गाठण्याच्या नादात चिमणी आडून शेतकर्यांची व कामगारांची रोजी रोटी हिरावून घेणारी सोलापुरातील चार टाळकी की अठ्ठावीस हजार सभासद शेतकरी? आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर पाकलमंत्र्यांच्या समोर शेतकर्यांच्या ऊसाच्या कांडीचे भविष्य उध्दवस्त करू पाहणार्या सोलापूर विकास मंचच्या चांडाळ चौकडीला तत्काळ कैद करून मुसक्या बांधायचे आदेश दिले असते. पण त्यांचा वारसा सांगणार्या आणि अभिमानाने मिरवणार्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सारख्या एका अत्यंत जबाबदार राज्यकर्त्याने ‘एका माणसाच्या हट्टापायी‘ हे असे शब्द उच्चारणे शोभत नाही.
कारखाना बंद पडला तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या धर्मराज काडादी यांचे काडीचेही नुकसान होणार नाही. ते काही उपाशी मरणार नाहीत. नुकसान होणार आहे ते शेतकरी सभासदांचे. कामगारांचे. त्यांची रोजी रोटी हिरावली जाणार आहे. सिध्देश्वर हा सहकारी साखर कारखाना आहे आणि त्याची मालकी सभासद शेतकर्यांची आहे, याचे भान सहकार आणि साखर कारखानदारीत मुरलेल्या नेत्याला राहू नये, याचे आश्चर्य वाटते. ते खरोखरच सोलापूरचे पालकमंत्री असतील तर अवघ्या दोन महिन्यात बोरामणी विमानतळासाठी अडलेली जमीन हस्तांतरीत करून सोलापूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ देऊ शकतात. दोन महिन्यात तिथे धावपट्टी बनवून चार महिन्यात विमानसेवा सुरू करू शकतात. पण तसे न करता त्यांनी चिमणी आडच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करून सिध्देश्वर साखर कारखान्याचा नरडीचा घोटच घ्यायचे ठरविले असेल तर आम्ही तरी काय करणार? पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की लोकशाही मार्गाने त्यांनी चिमणी पाडण्याचे स्वप्न विसरून जावे. चिमणी पाडून कारखाना उध्दवस्त करू पाहणार्या त्यांच्या आणि चिमणीच्यामध्ये जे अठ्ठावीस हजार शेतकरी आणि पंधरा हजार कामगारांनी एकजुटीची जी भिंत उभी केली आहे. ती त्यांना चिरडावी लागेल.
पोलिस बोलवा, लष्कर बोलवा आणि त्यांना खल्लास करून त्यांची आधी थडगी बांधा. मग तुमच्या मार्गातील सगळे अडथळे दूर होऊन मगच तुम्हाला चिमणी पाडून विमानसेवेचा जिर्णोध्दार करता येईल, एवढे लक्षात ठेवावे. सोलपुरचा इतिहास लधवय्या आहे. इथल्या कामगारानी देशात सर्वात आधी इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला आणि तीन दिवसांचे स्वातंत्र भोगले. त्याची किम्मत मोजतना चार हुतात्में हसत फ़ासावर गेले. बलिदान आमच्या रक्तात आहे, ते आम्हाला नविन नाही. परिक्षा तुम्ही इंग्रज होता का ? त्याची असेल.
(सदस्य, बोरामणी विमानतळ व सिध्देश्वर कारखाना बचाव कृती समिती.)


















