सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्यास संपूर्ण भारतीय जनता पार्टी जबाबदार असल्याचा आरोप कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केला आहे. गुरुवारी दुपारी चिमणी पाडण्यात आली. शुक्रवारी काडादी यांच्या गंगा या निवासस्थानी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी त्यांच्या समर्थनार्थ भेट घेतली. त्यानंतर शनिवारी सकाळच्या सुमारास काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि माजी आमदार आडम मास्तर हे साखर कारखान्यावर धर्मराज काडादी यांच्या भेटीला गेले. हे दोन एकमेकांचे विरोधक योगायोग एकत्रितच भेटले. सर्वांनी मिळून काडादी यांच्याशी चर्चा केली. समोर बसलेल्या कामगारांना दिलासा दिला.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी विमानतळाचा प्रस्ताव आणला, ते सुरू करण्याऐवजी भारतीय जनता पार्टीने सुडबुद्धिने ही चिमणी पाडली, त्यांना विकास करायचा नाही, त्यामुळे हजारो कामगार आणि हजारो शेतकरी यांचे नुकसान झाले. भाजपावाल्यांना अक्कल नाही ती महाबोगस पार्टी आहे. केवळ सत्तेसाठी आणि पन्नास खोक्यासाठी ते सत्तेत आले. परंतु माझे भारतीय जनता पार्टीला चॅलेंज आहे त्यांनी येणाऱ्या तीन महिन्यात विमानसेवा सुरू करून दाखवावी.
आडम मास्तर म्हणाले, वंदे भारत ट्रेन सुरू केली परंतु त्यातील अर्धे शिट रिकामे असतात कामगार कष्टकरी काय विमानातून प्रवास करणार आहेत का? सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा महापालिका करते त्यांना जनतेच्या मूलभूत प्रश्नाचे घेणे देणे नाही परंतु चिमणी पाडून तीस हजार शेतकरी कामगारांच्या तोंडात माती घातली आता धर्मराज काडादी यांनी सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरकरांची एक बैठक घेऊन सरकारचा निषेध करू यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचा निर्धार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सोलापुरातून भारतीय जनता पार्टीचा एकही माणूस निवडून येणार नाही यासाठी आपण आवाहन करू.

















