सोलापूर ! शाहीर वस्ती येथील कणके सभागृहात शिवसंपर्क अभियानाची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, सिध्दु गुब्याडकर, माजी नगरसेवक बाळू पाटील यांचे चिरंजीव सुरज पाटील, नूतन उपशहरप्रमुख व या बैठकीचे आयोजक मलिक हब्बु, माजी नगरसेविका उषा हब्बु, लहू गायकवाड, रतन खैरमोडे, तुषार आवताडे, रविकांत गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती बघून प्रभावित झाल्याचे सांगत, माजी नगरसेवक प्रमोद काशीद पैलवान यांनी शिवसेना प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म भरून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले, या भागातून पूर्वी शिवसेनेचे राजू भिंगारे, उषा हब्बू आणि बाळू पाटील हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आले होते. पुढे आपलीच करंगळी पकडत भारतीय जनता पार्टीने या भागात आपलीच माणसे फोडली आपल्याच नेत्यांना भाषण करायला लावली आणि हा भाग जणू भाजपाचा बालेकिल्ला असल्याचे भासवले, मात्र वास्तविक हा भाग हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे. आजवर युतीमुळे आम्ही सोबत होतो. मात्र यापुढे फोडा आणि राज्य करा हे तुमचं गलिच्छ राजकारण खपवून घेतलं जाणार नाही. शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी शिवसेना ही समाजकारणावर टिकलेली संघटना आहे, नागरिकांच्या अडीअडचणीला सर्वप्रथम धावून जाण्याचं कार्य शिवसैनिकांनी केलं पाहिजे. वाघांनी आपली ओळख न विसरता ताकदीने एकत्र येत महानगरपालिकेवर भगवा फडकविताना या भागातील जास्तीत जास्त भगव्याचे शिलेदार पाठवावेत असे आवाहन केले. विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे यांनी उद्धव साहेबांनी राज्याला ज्या आपुलकीने सांभाळले, तेवढेच दुर्लक्ष या भागातून निवडून येऊन महापालिकेतील पदाधिकारी बनलेल्या लोकप्रतिनिधींनी या भागाकडे केल्याचे बोलून दाखविले.
या बैठकीचे सूत्रसंचालन विजय पुकाळे यांनी केले.



















